पणजी : पुढारी वृत्तसेवा
भांडवली खर्चात झालेली ऐतिहासिक वाढ पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, रेल्वे आणि शहरी विकासाला चालना देईल. तसेच सात धोरणात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादन क्षमतेवर दिलेला भर एमएसएमई, रोजगारनिर्मिती आणि देशांतर्गत मूल्यसाखळी मजबूत करेल, अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या अर्थसंकल्पात नवीन झालेल्या कुशावती जिल्ह्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेले नाही. तसेच राज्यासाठी कोणतीही घोषणा करण्यात न आल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० च्या प्रारंभामुळे पूर्ण-स्तरीय डिझाईन, भारतीय बौद्धिक संपदा आणि पुरवठा साखळीला प्रोत्साहन मिळून तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेकडे भारत ठोस पाऊल टाकत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
बायोफार्मा शक्ती उपक्रम, निपेर संस्थांचा विस्तार, क्लिनिकल ट्रायल नेटवर्क आणि वैद्यकीय पर्यटन हब्समुळे भारत स्वस्त, दर्जेदार आरोग्यसेवा व जैविक औषधांचा जागतिक केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नारळ उत्पादक राज्ये, भारतीय काजू व नारळ क्षेत्र, कृषी-प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पामध्ये दिलेला विशेष भर किनारी अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.