

काणकोण : पुढारी वृत्तसेवा
काणकोण पालिकेने बांधलेले व्यापार संकुल गेल्या दहापेक्षा अधिक वर्षे ओसाड पडले असून हे संकुल सध्या भटकी गुरे, कुत्रे व मद्यपींसाठी आश्रयस्थान झाले आहे तर सध्या येथे पक्ष्यांनी व श्वानांनी विष्ठा केल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या २ रोजी काणकोण पालिकेने चावडी पणसुले मार्गाच्या बाजूला बसून जे व्यापारी व्यापार करतात, त्यांनी रिकाम्या असलेल्या बाजार संकुलात जागा मिळविण्यादृष्टीने पालिकेकडे अर्ज करावा, असे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांना अर्ज करण्यासाठी १० दिवसांची मुदत सुद्धा दिली होती.
आता एक महिना संपून गेला तरी अजूनपर्यंत पालिकेकड़े एकही अर्ज आलेला नाही, अशी माहिती नगराध्यक्ष लक्ष्मण पागी यांनी दिली.
रस्त्याकडेला व्यापार करतेवेळी रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचा ब्रेक निकामी झाला व अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल करून रस्त्याबाजूला बसून व्यापार करणाऱ्यांना जागा देण्यादृष्टिने पालिकेने आवाहन केले होते.
त्या आवाहनाचे या व्यापाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहे, हे व्यापारी रस्त्याबाजूला बसून बिनदिक्कत व्यापार करीत आहेत. तर ५-६ जण महिला बाजार संकुलाच्या प्रमुखद्वाराशेजारी आपला व्यापार करीत आहेत. रस्त्याबाजूला माल मिळत असल्याने बाजार संकुलात बसलेल्याना मात्र ग्राहकांची प्रतीक्षा करीत राहावे लागत आहे.
माल जप्त करण्याचा विचार : रमाकांत नाईक
गावकर चावडी वार्डाचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांना विचारले असता पालिकेच्या संबधितांना या संबधी सर्व सूचना केल्या असून सदर व्यापाऱ्यांनी रस्त्याबाजूला बसून व्यापार करण्याचे बंद न केल्यास त्यांचा माल जप्त करण्याचा पालिकेचा विचार असल्याचे नाईक गावकर यांनी सांगितले. या संबधी आपण मुख्याधिकारी व इतरांशी चर्चा केल्याचे नाईक गावकर यांनी सांगितले.