

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ करण्यासाठी भाजपला २०२७ मध्ये निवडणुकीत विजयी करा. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारत देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. एआय मिशन राबवण्याचा पहिला मान आपल्या गोव्याला मिळाला आहे.
आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी आयटी आणि पर्यटन खात्यात आमूलाग्र बदल आणला आहे, त्यांचे कौतुक आणि ते अभिनंदनास पात्र आहेत. सुमारे चार वर्षे लाखांचे अनुदान देतो, याचा फायदा गरजूंना होतो. हे सर्व करण्यासाठी भाजपला २०२७ च्या निवडणुकीत विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख या नात्याने ते बोलत होते.
यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष दामोदर नाईक, सभापती डॉ. गणेश गावकर, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, इतर आमदार, पेन्ह द फ्रान्सचे जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, सुकूरचे जिल्हा पंचायत सदस्य अमित अस्नोडकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, सुकूरच्या सरपंच सोनिया संजय पेडणेकर, मंत्री खंवटे यांच्या मातोश्री सुनंदा खंवटे व कुटुंबीय तसेच तिन्ही पंचायतीचे पंच सदस्य उपस्थित होते.
सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. मंत्री खंवटे यांनी बोलताना पर्वरीकर माझे कुटुंबीय आहेत. पर्वरी मतदारसंघातील तिन्ही पंचायत मंडळाने सतत सहकार्य केले. २०१२ आणि २०१७ या दोन्ही निवडणुकी अपक्ष म्हणून लढवल्या; त्यात पर्वरीकरांनी मला पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून दिले.
२०२२ मध्ये भाजपमधून निवडणूक लढवली, त्यामध्येही यशस्वी झालो; हे सर्व त्यांच्या मदतीमुळेच, असे ते म्हणाले. यावेळी सभापती गणेश गावकर आणि प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी विचार मांडून खंवटे यांना शुभेच्छा दिल्या. जीसीएच्या मैदानावर वाढदिवस स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गीत गायन आणि संगीताने उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे उत्तम सहकार्य :
मंत्री खंवटे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला उत्तम सहकार्य आणि पाठिंबा दिला. त्यामुळे मतदारसंघात रस्ते, पाणी आणि वीज तसेच अनेक प्रकल्प निर्माण करण्यात यशस्वी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ संकल्पना पूर्ततेसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे उद्गार मंत्री खंवटे यांनी काढले.
विविध उपक्रमांचे आयोजन
प्रारंभी सकाळी खंवटे यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. यावेळी संजय स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.