

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
शापोरा नदीतीरावरील आगरपोय बंधाऱ्यावरील मानसीची कवाडे उखडल्याने नदीचे पाणी भातशेती तसेच मिठागरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जलसिंचन खात्याने उघडलेल्या मानसीची कवाडे तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी शेतकरी व मीठ उत्पादकांकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच जलसिंचन खातातर्फे मानसीची कवाडे बसवण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच ही कवाडे उखडल्याने शापोरा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात भातशेती आणि मिठागरांमध्ये घुसले. त्यामुळे भातशेती तसेच मिठागरे पाण्याखाली आली आहेत.
वेळेत दुरुस्ती न झाल्यास नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अखिल गोवा मीठ उत्पादक संघटनेचे सचिव ऋषिकेश नाईक म्हणाले की, सरकारने मीठ उत्पादकांना दिलासा देण्यासाठी विविध पावले उचलली असून आर्थिक मदतही केली आहे.
मात्र, मीठ उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या शापोरा नदीतीरावरील आगरपोय बंधाऱ्याच्या मानसीसाठी जलसिंचन खात्याने बसवलेली कवाडे निकृष्ट कामामुळे पावसाात उखडली. परिणामी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात भातशेतीत आणि मिठागरांमध्ये घुसले आहे. मानसीची तातडीने दुरुस्ती न केल्यास मिठागरेही पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
अखिल गोवा मीठ उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण बगळी म्हणाले की, जलस्रोता खात्याकडून मीठ उत्पादकांना वेळोवेळी योग्य मदत मिळते. स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्याने आगरपोय बंधाऱ्याच्या मानसीचे काम करण्यात आले होते.