पणजी : 'म्हादई' चे पाणी अद्याप वळवले नाही! | पुढारी

पणजी : 'म्हादई' चे पाणी अद्याप वळवले नाही!

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  म्हादई खोऱ्यातील २.१८ टीएमसी पाणी भांडुरा धरणासाठी आणि १.७२ बिश्वेश्वर तुडू टीएमसी पाणी काळसा धरणात काही निर्देशांची पूर्तता करून वळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कळसा आणि भांडुरा नाला वळण योजनेच्या डीपीआरला जलविज्ञान आणि आंतरराज्य पैलूंवरून सीडब्ल्यूसीद्वारे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र प्रतिज्ञापत्रानुसार गोव्याकडे जाणारे पाणी अद्याप वळवण्यात आलेले नाही, असे उत्तर जलशक्ती मंत्रालयाने राज्यसभेत दिले.

तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांनी या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी उत्तर दिले. काही अटींचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन हे करार आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांनी म्हादई खोऱ्यातील पाणी वळवले नसल्याचेही तुडू यांनी स्पष्ट केले.

म्हादई जल विवादाच्या निर्णयांचे पालन आणि अंमलबजावणी सुरक्षित करण्यासाठी आंतरराज्य नदी पाणी विवाद कायदा, १९५६ च्या कलम ६ च्या तरतुदीनुसार म्हादई प्राधिकरणाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. न्यायाधिकरण पर्यावरण मंत्रालयाच्या ईआयए अधिसूचना २००६ अंतर्गत पर्यावरण मंजुरीची आवश्यकता असलेल्या प्रकल्पांसाठी किंवा उपक्रमांसाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनासाठी संदर्भाच्या मानक अटी किंवा पर्यावरण व्यवस्थापन योजना अहवालानुसार पर्यावरण प्रवाह विचारात घेऊन जलशक्ती मंत्रालयाद्वारे तीनही खोऱ्यातील राज्यांसाठी परवानगी दिली जाते, असेही ते म्हणाले.

गोव्याला न्याय मिळेल

म्हादईप्रश्नी सरकार आणि भाजपची भूमिका ठाम आहे. म्हादईचा प्रवाह रोखण्यास आमचा नेहमीच विरोध आहे. कर्नाटकाने न्यायालयाचे आदेश असतानाही जमिनीखाली कालवे बांधून पाणी वळवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम राहणार असून न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळणार आहे, असे राज्यसभेचे गोवा भाजपचे खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

• २.१८ टीएमसी पाणी भांडुरा धरणासाठी वळविण्यास मान्यता
• १.७२ टीएमसी पाणी काळसा धरणासाठी वळविणार
• पाणी वळविले नसल्याचे कर्नाटक, महाराष्ट्राचे प्रतिज्ञापत्र

Back to top button