![प्रमोद सावंत यांचा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, नवा मुख्यमंत्री कोण?](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि.१२) शनिवारी दुपारी पावणे बारा वाजता राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला, त्यांना पुढील सरकारी येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर १९ मार्च २०१९ रोजी गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली होती. राजीनामा देतेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मुख्यमंत्र्यांसोबत होते.
डॉ. सावंत यांच्या सरकारमध्ये सुरुवातीला गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि दोन अपक्ष असे सहभागी झाले होते. नंतर काँग्रेसमधून दहा आणि मगोप मधून दोन आमदार भाजपमध्ये आले आणि एका अपक्षाने मगोप आणि गोवा फॉरवर्डने भाजपची साथ सोडली. डॉ. सावंत यांच्या सरकारला तब्बल २७ आमदारांचा पाठिंबा होता. गोवा विधानसभेची आमदार संख्या ४० आहे.
विधानसभेच्या आताच्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ सावंत यांचा चेहरा पुढे करून भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरा गेला होता. ४० पैकी २० जागा जिंकण्यात भाजपला यश आलेले आहे. भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे.
पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, माजी आमदार रोहन खंवटे, माजी मुख्यमंत्री रवी नाईक अशी नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आली आहेत. भाजपचा विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी केंद्रीय संसदीय मंडळाकडून अद्याप निरीक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. यामुळे भाजप आपला विधी मंडळ गटनेता अद्याप निवडू शकलेला नाही.
इतर राज्यांमधून शपथविधीच्या तारखा जाहीर होत असतानाच गोव्यातील नव्या सरकारचा शपथविधी कधी याचे उत्तर मात्र शनिवारीही मिळू शकले नाही. काळजी व मुख्यमंत्री डॉ सावंत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले विधानसभा बरखास्तीचा ठराव मंत्रिमंडळामध्ये संमत करण्यात आला होता तो राज्यपालांकडे सादर केला.
नवीन सरकार निवडे सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तो राज्यपालांनी स्वीकारला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती दिली आहे. राजकीय निरीक्षक राज्यात कधी येतील याची आत्तापर्यंत तरी कल्पना नाही. चार राज्यांमध्ये शपथविधी होणार असल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या वेळेनुसार याबाबतचे निर्णय होतील.