

पणजी : गोव्यात रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि बेवारस अवस्थेत आढळणाऱ्या मुलांच्या संरक्षणासाठी महिला व बाल विकास विभागाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष बचाव मोहिमेत गेल्या तीन वर्षांत एकूण १०५ मुलांची सुटका करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी २३ मुलांना त्यांच्या मूळ गावी सुरक्षितपणे परत पाठविण्यात आले, ६ मुलांना नोंदणीकृत बालसंगोपन संस्थांमध्ये दाखल करण्यात आले, तर उर्वरित मुलांना आवश्यक पडताळणीनंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही बचाव मोहीम चाइल्ड हेल्पलाइन, स्थानिक पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. बाजारपेठा, पर्यटनस्थळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि प्रमुख वाहतूक चौक अशा संवेदनशील भागांत नियमित शोध आणि बचाव मोहीम राबविली जात आहे. सुटका करण्यात आलेल्या प्रत्येक मुलाला पुढील निर्णयासाठी बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) समोर हजर केले जाते. समिती संबंधित मुलाला कुटुंबाशी पुनर्मिलन, संस्थात्मक संगोपन किंवा मूळ गावी पुनर्वसन याबाबत निर्णय घेते.