मयुराच्या घरात सध्या घमासान चर्चा सुरू आहे; तिने नोकरी सुरू ठेवायची की नाही, या मुद्द्यावरून! मयुराला दिवस गेल्याचं कळून दोन अडीच महिने उलटले आहेत. गेले पंधरा दिवस सासूबाई, आज्जे सासूबाई, जाऊबाई, नणंद या सगळ्या मयुराच्या मागे लागल्या आहेत की, 'मयुरा नोकरी सोड!' त्यांचं म्हणणं असं की, 'आपल्या घरात लक्ष्मी पाणी भरते आहे.
शेती मोठी आहे. घरात कशाचीही कमी नाही. शिवाय मयुराच्या नवऱ्याचा नोकरीचा पगाराचा पैसाही घरात येतोय. मग मयुराने आपली लहानशी नोकरी या गरोदरपणात कशासाठी चालू ठेवायची?' मयुराचं म्हणणं एकच आहे, मी अगदी न चुकता डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाते. त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घेते.
डॉक्टरांनी सांगितलंय की, 'तुम्ही ठणठणीत आहात. जितक्या हसत्याखेळत्या आणि कामात गुंतलेल्या राहाल तितकं चांगलं !' शिवाय माझ्या नवऱ्यालासुद्धा हे पटलेलं आहे. तो मला कधीच 'तू नोकरी सोड आणि घरी बस' असा आग्रह करत नाही. उलट 'तुझ्या मनाला जे बरं वाटेल, तुझ्या बुद्धीला जे पटेल ते कर' असं तो म्हणतो.
म्हणून मग जमेल तितके महिने आपण नोकरी चालू ठेवायची, असं मयुराने मनाशी पक्क केलंय आणि सासरी सांगितलंयसुद्धा! त्यांच्या घरात सध्या चर्चा सुरू आहे ती त्यामुळेच छोट्याशा गावातून लग्न होऊन शहरात आलेली ही बारावी पास मयुरा स्वतःच्या जीवावर एका दाताच्या दवाखान्यात नोकरीला लागली ती रिसेप्शनिस्ट म्हणून ! आपण आपल्या पायावर उभ्या आहोत, आपला वेळ, बुद्धी आणि कौशल्य चांगल्या, आवडीच्या कामासाठी आपण उपयोगात आणतोय, असं तिला या नोकरीमुळे वाटायला लागलं होतं.
नोकरीचा तिला आधार तर वाटायचाच; पण ही नोकरी म्हणजे जगाची दारं आपल्यासाठी खुली करणारं माध्यम आहे, असं तिला वाटायचं. म्हणूनच गरज पडली तर गरोदरपणात रजा घेईन; पण नोकरी सोडणार मात्र नाही, असं मयुरा वामपणे सांगती आता मग असं सारं असताना मयुराचं काही चुकतंय, असं म्हणण्यात काय अर्थ? म्हणूनच खरंतर मयुराचा नवरा म्हणतो त्याप्रमाणे मयुराच्या मनाला जे बरं वाटेल आणि तिच्या बुद्धीला जे पटेल ते तिला करू द्यावं आणि बिनकारणाच्या वादांना सर्वांनीच पूर्णविराम देऊन टाकावा.