आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर अगदी संकटाच्या किंवा मंदीच्या काळातही सोनं आणि चांदी हा सुरक्षित व चमकदार पर्याय निवडण्याकडे कल दिसतो. त्यातही पसंतीच्या बाबतीत सोन्याला झुकतं माप मिळतं.
गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत वैविध्य आणायचं म्हणूनही अनेक जण त्यांच्या मालमत्तेचा, बचतीचा ठरावीक भाग सोनं किंवा चांदीच्या रूपात ठेवतात. आपल्या पोर्टफोलिओत मौल्यवान धातूचा समावेश करणं, ही गुंतवणूकदारांची वृत्ती जगभर सर्वत्र दिसून येते. इतर स्टॉक्स किंवा बाँड्सप्रमाणे या मौल्यवान धातूंची किंमत परस्परांवर अवलंबून नसते. पोर्टफोलिओतली जोखीम कमी व्हावी, गुंतवणुकीचे पर्याय वाढावे म्हणून सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदार आकर्षित होतात असं आढळून येतं. अर्थात, मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचं नियोजन करू पाहणार्यांना ‘अशी गुंतवणूक अगदी विचारपूर्वक करा,’ असा सल्ला तज्ज्ञ देतात.
तसं पाहता, सोनं ही भारतीय गुंतवणूकदारांसाठी सहज उपलब्ध असलेली वस्तू आहे आणि यात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याच्या रूपातली आपली मालमत्ता आता एक्स्चेंज ट्रेडेड फंड आणि ई-गोल्डच्या स्वरूपातही खरेदी करता येऊ शकते. डिमॅट अकाऊंटमधूनही एक्स्चेंज ट्रेडेड फंड हाताळता येऊ शकतात.
याद्वारे डिजिटल फॉर्ममधील सहज ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळवता येते. दुसरीकडे, चांदीची ‘बाजारातली कामगिरी’ उत्तम गणली जात असली तरीही ती सोन्याच्या मूल्यापर्यंत पोहोचताना दिसत नाही. मौल्यवान धातूंमध्ये केवळ सोनं आणि चांदी यांचा तुलनात्मक विचार केला, तर सोनं हा तुलनेने जास्त दुर्मीळ धातू ठरतो.
परिणामी त्याचं बाजारमूल्य जास्त मानलं जातं. आणखी एक बाब म्हणजे औद्योगिक वापरासाठी सोन्याच्या तुलनेत चांदीचा जास्त वापर होतो. या गरजेमुळे चांदी ‘हाय डिमांड कमोडिटी’ ठरते. त्यामुळे पुढील काही वर्षांत चांदीचे दर वाढतील, असाही तर्क व्यक्त केला जातो.
साधारणत: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिलं जातं. सोन्याच्या बाजाराच्या तुलनेत चांदीच्या बाजाराची उलाढाल कमी दिसून येते. अल्प मुदतीसाठी चांदी ही सोन्यापेक्षा जास्त आकर्षक ठरते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत रस असेल, तर सोनं अधिक मोहात पाडू शकतं. आकर्षण आणि मोह यांचा मेळ आपल्याला आपल्या प्रत्यक्षातल्या आर्थिक गणिताशी घालता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं. असा मेळ घालता आला तरच जमाखर्च, बचत व गुंतवणूक याचाही ताळमेळ साधला जाणं शक्य होतं, हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी कायम लक्षात ठेवायला हवं.