

आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यासाठी उत्तम गणितीय क्षमता, फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या महत्त्वपूर्ण टॉपिक्सची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. कठोर मेहनत, सतत अभ्यासाचा ध्यास, वेगाने प्रश्न सोडवण्याची हातोटी, प्राध्यापक आणि सहकारी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.
भारतात इंजिनिअरिंग विषयात आयआयटीला सर्वश्रेष्ठ संस्था मानले गेले आहे. पदवी प्राप्त करण्यासाठी आयआयटीला सर्वश्रेष्ठ संस्था मानले गेले आहे. यात प्रवेश मिळवणे जसे सन्मानजनक आहे, तेवढेच आव्हानात्मक आहे.
आयआयटी-जेईईच्या तयारीदरम्यान अशा काही खास गोष्टींचा समावेश असतो की त्याकडे लक्ष देऊन यशाचा मार्ग सहजपणे पार करू शकतो. या जोरावरच भारतातील उच्च संस्था आयआयटीत प्रवेश मिळवू शकतो. आपले ध्येय गाठण्यासाठी पुढील बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात.
आयआयटी-जेईई परीक्षेसाठी विश्वासार्ह आणि ध्येय साध्य करणारे अचूक अभ्यास साहित्य निवडणे आवश्यक आहे. कारण, परीक्षेसाठी कालावधी कमी असतो आणि अभ्यास साहित्य अधिक असते. त्यामुळे कमी वेळेत चांगली तयारी करून घेणारे अभ्याससाहित्य कोणते आहेत,
याबाबत आपण सजग असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आज आयआयटीशी निगडित असलेली अनेक प्रकाशनांची पुस्तके असतात. मात्र, ती सर्व वाचण्यापेक्षा त्याची उपयुक्तता तपासणेही तितकेच गरजेचे आहे.
आयआयटी मेन्स आणि अॅडव्हान्सच्या प्रवेश परीक्षेसाठी ११ वी आणि १२ च्या फिजिक्स, मॅथ्स व केमिस्ट्रीवर लक्ष्य केंद्रित करावे. कारण आयआयटी मेन प्रवेश परीक्षा ही विद्यार्थी पातळीवरची परीक्षा असते. या प्रवेश परीक्षेचे पेपर इंटरमीजिएट विषयाच्या आधारावर असतात.
जर आपण आयआयटी मेन्स प्रवेश परीक्षचे स्वप्न पाहत असाल तर आपल्याला इंटरमधूनच या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अभ्यास कोणताही असो तो घोकंपट्टी करण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून दीर्घकाळापर्यंत संबंधिताची माहिती लक्षात राहील तसेच पुढेही अभ्यासात मदत करेल.
आयआयटी-जेईई सर्वात कठीण परीक्षेपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी चांगल्या रणनीतीबराबेरच अभ्यास केला, तर निश्चितच यश मिळू शकते. पात्र ठरण्यासाठी निश्चित केलेला अभ्यासक्रम लक्षात ठेऊन आपला अभ्यास पूर्ण करायला हवा. जसे की न्यूमेरिकल प्रॉब्लेम जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा.
उत्तर लिहिताना होणाऱ्या चुका बाजूला लिहून काढा आणि त्या चुका पुन्हा टाळा. दररोज आपले नवीन लक्ष्य तयार करा आणि ते गाठण्यासाठी वेगवेगळी रणनीती तयार करा. कठीण विषयाला अधिक वेळ घा. जास्त वेळ दिल्यास सुधारणेला वाव असतो. आपल्या अभ्यासक्रमातील कठीण भागाकडे लक्ष द्या आणि त्यावरच अधिक भर द्या. गेल्यावर्षीच्या पेपर पद्धतीचे अवलोकन करा आणि त्याचे विश्लेषण करून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.
टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचे व्यवस्थापन होय. परीक्षा कोणतीही असो, विद्यार्थ्याला एकच गोष्ट वारंवार सांगितली जाते, ती म्हणजे वेळेचे काटेकोर पालन आणि नियोजन होय. जेईईची तयारी करणाऱ्या मंडळींसाठी ही बाब खूपच महत्त्वाची आहे. कारण, त्यांच्याकडे वेळ खूपच कमी राहिला आहे.
शैक्षणिक साहित्य आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अजूनही काही वाचन बाकी राहिले असेल. वेळेचे नियोजन करून वाचन आणि मनन पूर्ण करा. कोणत्या विषयाला किती वेळ घायचा याबाबत पालक, प्राध्यापक, अनुभवी विद्यार्थी यांच्याशी सल्लामसलत करावी. अवघड विषयाला जादा वेळ देणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर त्याची उजळणी करण्यासाठीही पुरेसा वेळ द्यायला हवा. वेळेनुसार विषयाची प्राथमिकता निश्चित करणेही गरजेचे आहे.