स्पर्धा परीक्षा ही व्यक्तीची परीक्षा नसून ती एक व्यक्तिमत्त्व तपासणीची परीक्षा असते. उमेदवाराने स्वतःच्या पुस्तकी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक असते. व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वेळेचे नियोजन होय. स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा प्रत्येक दिवस म्हणजे एक प्रकारची स्वतःबरोबरची लढाई असतेे. यासाठीच प्रत्येक दिवसाच्या नियोजनालाही तितकेच महत्त्व असते. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम लक्षात घेता उमेेदवाराला किमान एक ते दीड वर्षाच्या अभ्यासाबरोबरच इतर कौशल्यांचा विकास करणे अनिर्वाय ठरते. जर अभ्यासाला योग्य नियोजनाची जोड दिल्यास यश प्राप्तीचा कालावधी कमी होऊ शकतो.
अभ्यासाला प्रारंभ केल्यानंतर उमेदवार प्रथम परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम लक्षात घेऊन प्रत्येक विषयच्या अनुषंगाने मूलभूत संकल्पना समजावून घेणे उचित ठरते त्यासाठी महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्यपुस्तके (इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंत) किंवा NCERT यांचा वापर करावा. यानंतर परीक्षेच्या पूर्व, मख्य व मुलाखत या टप्प्यांच्या तयारीसाठी अनुकूल गोष्टी करण्यास सुरुवात करावी. मागील काही वर्षांचा विचार करता पूर्व परीक्षा ही दरवर्षी अंदाजे एप्रिल-मे महिन्यांत होते. (अपवाद 2019 वर्ष) या दृष्टीने उमेदवाराने प्रथम मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा.
मुख्य परीक्षा नियोजन :
अंदाजे आजपासून पुढील पाच महिने याच्या अभ्यासाला द्यावेत, सर्वप्रथम गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा यामुळे प्रश्नांचे स्वरूप, प्रकार व विषयाची काठिण्यापातळी समजते म्हणजेच परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका हे दोन्ही अभ्यासाचे दिशादर्शक म्हणून कार्य करतात. यानुसार संदर्भपुस्तकांची निवड करावी, दिवसाच्या नियोजनात दररोज अंदाजे सहा ते सात तास अभ्यास होईल, याप्रमाणे दोन विषय व वर्तमानपत्राचे वाचन करावे, यामुळे अभ्यासात वैविध्य व उत्साह राहतो.
पूर्व परीक्षा नियोजन –
या पाच महिन्यांनंतर पूर्व परीक्षेपर्यंत फक्त पूर्व परीक्षेवर लक्ष केंद्रीत करावे. या मध्ये GS1 व GS2 (CSAT) यांचा समावेश होतो. आपण अगोदर मुख्य परीक्षाच्या अभ्यासातून पूर्व परीक्षेचा बराचसा भाग अभ्यासलेला आहे. (GS1 मधील) यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे GS2 (CSAT) ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, आकलन यांसारख्या सरावाच्या गोष्टींचा समावेश होतो. दिवसाच्या नियोजनात सात तासांत GS1 व GS2 दोहोंचा अभ्यास करावा. या प्रमाणे संपूर्ण अभ्यास झाल्यावर उजळणी करावी अन्यथा वर्षभरची मेहनत फुकट जाऊ शकते म्हणूनच उजळणीला अनन्य साधारण महत्त्व असते. मुलाखतीची तयारी ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. याची तयारी अवांतर वाचन, वर्तमानपत्र व इतर गोष्टींच्या सरावातून होत असत याचा सखोल आढावा आपण पुढील लेखात घेऊ.