EDU दिशा : UPSC / MPSC अवांतर वाचन आणि मी | पुढारी

EDU दिशा : UPSC / MPSC अवांतर वाचन आणि मी

“ पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून  आपणास घेऊन जाणारी जहाजे होत” 

मात्र नवीन पिढीचा विचार केल्यास ही जहाजे कुठेतरी बुडू लागली आहेत की काय असा प्रश्‍न  निर्माण होतो. विकासाच्या प्रकियेत तंत्रज्ञानाने अवकाशास गवसणी घातली, मात्र त्यामुळे की काय वाचन प्रक्रिया नामवेश होताना दिसते.

स्पर्धा परीक्षाच्या बाबतीत विचार केल्यास वाचणास अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे देखील अवांतर वाचन हे तर उमेदवारास रस्ता दाखविणारा वाटाड्या ठरते. स्पर्धा परीक्षेचे बदललेले स्वरूप लक्षात घेता पुुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर ज्ञान असणे अनिर्वाय ठरते. 

संबंधित बातम्या

अभ्यासक्रमातील संकल्पना फक्‍त वाचणे हा मुद्दा नसून त्यावर विचार करणे यासाठी इतर वाचनाची  आवश्यकता भासते. गेल्या काही वर्षांचा विचार करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आलेला महत्त्वाचा बदल म्हणजे प्रश्‍नांचे स्वरूप -बरेचसे प्रश्‍न हे विधानात्मक स्वरूपाचे केल्यामुळे उमेदवारास अभ्यासक्रमातील मुद्द्यांना अवांतर मुद्द्यांशी जोडणी (Linking) करावी लागते. तसेच विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांपैकी सर्वच प्रश्‍नांची उत्तरे ही कोणत्याच उमेदवारास ज्ञात नसतात, अशावेळी स्पर्धा करताना उमेदवारास काही प्रश्‍नांसाठी Risk  घ्यावी लागते. यासाठी ही पुस्तके उपयोगी ठरतात.

UPSC  मुख्य परीक्षेचा विचार केल्यास ती संपूर्णपणे वर्णनात्मक (Descriptive) असल्या कारणाने प्रश्‍नाचा रोख हा तुमचे मत जाणण्यावर असतो, अशा परिस्थितीत उमेदवरास कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळ्या दिशांनी विचार करावा लागतो, त्यासंदर्भातील सकारात्मक नकारात्मक मुद्दे विचारात घेऊन त्यामधील सुवर्णमध्य काढावा लागतो यासाठी अवांतर वाचन खूप मोलाचा वाटा देते. 

MPSC  असा वा UPSC निबंध  (Essay)  लिखाण हा अनिवार्य भाग आला. मात्र, निबंध ही फक्‍त (GS ) च्या जोरावर लिहिता येणारी गोष्ट नसून त्यासाठी दिलेल्या विषयावर विचार करून शब्दांची गुंफण करावी लागते यासाठी देखील अवांतर वाचन महत्त्वाचे ठरते. 

स्पर्धा परीक्षा ही व्यक्‍तीची परीक्षा नसून व्यक्‍तिमत्त्वाची परीक्षा असते आणि व्यक्‍तिमत्त्व सुधारणेतील महत्त्वाचा टप्पा अवांतर वाचनाचा ठरतो. यामुळे उमेदवाराच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. अगदी शेवटच्या टप्प्यातील मुलाखतीत देखील याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या दिसतो व स्पर्धा करताना उमेदवार हळूवारपणे इतरांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जातो. अशाप्रकारे स्पर्धा परीक्षाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग अवांतर वाचनाचा असतो.

फक्‍त परीक्षेपुरतेच मर्यादित न राहता याचा फायदा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होतो. आयुष्याला कलाटणी देणारा एका उपक्रम या द‍ृष्टीने आपण याकडे पाहू शकतो.

Back to top button