

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात असलेल्या गंधारनगर भागातील दोघा इसमांनी एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली कल्याणात राहणाऱ्या एका महिलेची 5 लाख 10 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेने खडकपाडा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.15) जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून फसवणूक करणाऱ्या ठगांचा शोध सुरू केला आहे.
यातील तक्रारदार महिला या कल्याणमधील गोकुळनगरी/गंधारनगर भागातच राहतात. त्यांच्याबाबतीत एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. दोन संशयितांच्या विरोधात सदर महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा, तसेच बदनामी केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मुलाला अहमदनगर येथील विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा होता. हा प्रवेश करून देण्याचे आमिष एक इसम आणि त्याच्या स्वीय सहाय्यकाने दाखविले. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधितांनी या महिलेकडून रोख आणि ऑनलाईन माध्यमातून 5 लाख 50 हजार रूपये उकळले. मुलाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याचे महिलेला भासविण्यात आले. तथापी प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलीच नसल्याचे तक्रारदार महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने दिलेले पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला असता त्या रकमेतील अवघे 40 हजार रूपये संबंधितांनी परत केले. उर्वरित रक्कम परत मागण्याचा तगादा लावूनही ती रक्कम अद्याप परत करण्यात आली नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक संबंधितांनी केल्याची या महिलेला खात्री पटली. सतत पैसे परत मागण्याचा तगादा लावला आणि आपली बदनामी केल्यास ठार मारण्याची धमकी संबंधितांनी दिल्याचे या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची तक्रार दाखल होताच खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या आदेशांनुसार संबंधितांंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड आणि त्यांचे सहकारी चौकस तपास करत आहेत.
कर्ज मिळवून देतो असे सांगून काही जणांना कल्याण, पनवेल, ठाणे परिसरातील काही नागरिकांची बँक प्रक्रिया शुल्क घेऊन फसवणूक केल्याचे कल्याणमधील प्रकरण ताजे असतानाच आता हे प्रकरण उघडकीस आले आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात काही बदमाश शेअर, गुंतवणूक, प्रवेश प्रक्रिया आदी विविध क्लृप्त्या लढवून वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे अनोळखींच्याच नव्हे ओळखीच्या व्यक्तींवर विश्वास धोक्याचा असल्याच्या घटना चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत.