नरेंद्र राठोड, ठाणे
१९८० च्या दशकात मुंबईमधील काही गुंड टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला होता. गुंडांच्या रक्तपाताला रोखण्यासाठी कुख्यात गुंडांना सरळसरळ गोळी मारून त्यांचा खात्मा करण्यास याच काळात पोलिसांना सर्वप्रथम परवानगी देण्यात आली. मुंबईतला सर्वात पहिला एन्काऊंटर मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मुंबईतला एकेकाळचा कुख्यात गुंड मन्या सुर्वे याचा करण्यात आला.
इसाक बागवान या पोलिस अधिकाऱ्याने मन्या सुर्वेचा ११ जानेवारी १९८२ साली वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेज परिसरात एन्काऊंटर केला होता. सुर्वेच्या एन्काऊंटरनंतर मुंबई अंडरवर्ल्डमधील भलेभले गुंड हादरून गेले होते. त्यामुळे कुख्यात गुंडांवर याच प्रकारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबईतील बिल्डर, उद्योगपतीवर्गातून त्याकाळी जोर धरू लागली होती.
मुंबई पोलिसांनी गुंडांना जशास तसे उत्तर देण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली. याच विशेष पथकाला पुढे जाऊन इंग्रजी मीडियाने 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट टीम' असे नाव दिले. त्याकाळी मुंबई क्राईम ब्रेचमध्ये कार्यरत असलेल्या रणजित शर्मा, डी. शिवानंदन, प्रदीप सावंत आदी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या या मोहिमेसाठी प्रदीप शर्मा, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, सचिन वाझे, अरुण बोरुडे, दया नायक, अस्लम मोमीन आदी डॅशिंग अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रदीप सावंत मुंबई क्राईम ब्रचचे डीसीपी असताना तब्बल तीनशेहून अधिक गुंडांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता.
मुंबई पोलिसांच्या या जबरदस्त अॅक्शनमोडमुळे अंडरवर्ल्डचे भलेभले डॉन बिळात लपून बसले. साहजिकच, त्यानंतर गुंडांवर जरब बसवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना मीडियाने हीरो बनवून टाकले. मात्र, या एन्काऊंटर टीमला खरे ग्रहण लागले ते म्हणजे छोटा राजन टोळीतील हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या आणि घाटकोपर वॉम्बस्फोस्ट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस या दोघांच्या एन्काऊंटरमुळे.
डिसेंबर २००२ मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या वॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता, तर ३९ लोक जखमी झाले होते. याप्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. २७ वर्षीय ख्वाजा युनूसची ६ जानेवारी २००३ रोजी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.
मात्र, कोटनि युनूस प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. युनूसची चौकशी करणाऱ्यांमध्ये सचिन वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्यांना २००४ मध्ये बडतर्फदेखील करण्यात आले होते.
दुसरे प्रकरण सर्वाधिक वादग्रस्त ठरले ते म्हणजे लखनभय्या एन्काऊंटर. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून लखनभय्या याला नोव्हेंबर २००६ मध्ये प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांच्या पथकाने वाशी येथून उचलले होते. त्यानंतर वर्सोवा येथील नाना- नानी पार्कजवळ लखनभय्याचे एन्काऊंटर करण्यात आले.
या घटनेनंतर लखनभय्याच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने एन्काऊंटर फेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासमेत २२ जणांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप शर्मा हे निर्दोष सुटले; मात्र बाकीच्या पोलिस अधिकाऱ्यांना कोटनि शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये ठाण्यातील एका विकसकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी, तर २०१० मध्ये एका व्यक्तीवर गोळीबार प्रकरणात आंग्रे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्यात आंग्रे यांना १४ महिने तुरुंगात राहावे लागले होते. मात्र, आंग्रे यांची सबळ पुराव्यांअभावी सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली होती. छोटा राजन टोळीतील हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याचा एन्काऊंटर वाझेसह त्याच्या टीमच्या चांगलाच अंगलट आला. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी बिरुद मिरवणाऱ्या बऱ्याच पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली. त्यानंतर बरीच वर्षे न्यायालयीन लढाई लढून काही अधिकारी पुन्हा पोलिस सेवेत रुजू झाले.
पोलिस दलात रिएंट्री करणाऱ्यांमध्ये प्रदीप शर्मा, दया नायक ही प्रमुख नावे होती. परंतु, सचिन वाझे अद्यापही पोलिस दलाबाहेर होता. आपली टीम पुन्हा पोलिस दलात रुजू झाल्यानंतर वाझेलादेखील पोलिस दलात परतण्याचे वेध लागले. मात्र, त्याने स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिल्याने त्याचे पोलिस दलात परतण्याचे मार्ग नियमानुसार बंद झाले होते.
पोलिस दलाबाहेर राहूनही सतत एन्काऊंटर स्पेशालिस्ट हे भूषण मिरवत फिरणाऱ्या वाझेला पोलिस दलात परतण्याची संधी चालून आली ती २०२० साली. त्याला सगळे नियम- कायदे डावलून पुन्हा पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षकपदावर नियुक्ती देण्यात आली.
वाझेला पोलिस दलात फक्त रिएंट्रीच मिळाली नाही, तर त्यास थेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागासारख्या अतिमहत्त्वाच्या विभाग प्रमुखपदी बसवण्यात आले. पूर्वीसारखी अमाप प्रसिद्धी व पैसा मिळवण्यासाठी तो सतत नवनवीन मार्ग शोधत होता. पैसा व प्रसिद्धीच्या लालसेने ग्रासलेल्या वाड्रोला काही तरी मोठा कारनामा करून दाखवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. याच काळात त्याने भारतातले सगळ्यात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याचा प्लॅन आखण्यास सुरुवात केली; पण हाच प्लॅन त्यास अखेर गजाआड घेऊन गेला.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचे नाट्य नेमके वाझेने का रचले, याचा सविस्तर खुलासा अद्यापदेखील तपास यंत्रणांनी केलेला नाही. मात्र, वाझेने केलेले काटेकोर प्लॅनिंग, घटनास्थळाची निवड, घटनेच्या तपासाचे आगामी नियोजन या साऱ्या घटनेवरून हा प्रकार फक्त प्रसिद्धी व आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी नक्कीच घडवून आणलेला नाही, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. हे सारे भयंकर कारस्थान शेकडो कोटींच्या खंडणी वसुलीचा कट होता, असेदेखील तपासातून समोर येत आहे.
सचिन हिंदुराव वाझे हे नाव सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या वादाचे कारण बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २२ फेब्रवारी १९७२ रोजी जन्म झालेल्या वाझेने १९९० साली पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून एन्ट्री केली होती. सुरुवातीलाच गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात वाझेला पोस्टिंग देण्यात आली होती. मात्र, आपल्या ओळखीच्या बळावर वाझेने दोन वर्षातच ठाण्यासारख्या महानगरात आपली बदली करून घेतली. त्यानंतर वाझे मुंबई पोलिस दलात आला व येथे त्यास परमबीर सिंग, प्रदीप शर्मासारख्या अधिकाऱ्यांच्या टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत वाझेने अल्पावधीतच एन्काऊंर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती मिळवली.