

अशोक मोराळे, पुणे
पुण्याच्या कोथरुड परिसरात राहणारे महेंद्र पाटील (नाव बदलले) खासगी कंपनीतील सेवानिवृत्तीनंतर कुटुंबीयांसोबत छान आयुष्य जगत होते. जुलै महिन्याचा तो दिवस होता. कर्वे रस्त्याने जात असताना त्यांच्याकडे पाहून एक महिला हसली. तिने आपले नाव अवंतिका असे सांगितले. पाटील म्हणाले, ‘अहो मी आपल्याला ओळखत नाही.’ अवंतिकाने उत्तर दिले, ‘तुम्ही दररोज येथे फिरायला येता, मी तुम्हाला ओळखते.’ अवंतिकाने आपला पहिला फासा बरोबर टाकला होता. पाटलांना याची कल्पना आली नाही की, तो त्यांच्यासाठी लावलेला ‘हनी ट्रॅप’ होता. तीन-चार दिवसांनी फोन करून अवंतिकाने पाटलांना भाची आजारी असल्याचे कारण सांगून हजार रुपयांची मागणी केली. पाटलांनी तिला पैसे दिले. त्यानंतर परत तिने स्वत: आजारी असल्याचे सांगून चार हजार रुपये मागितले. ते देखील त्यांनी दिले. अवंतिकाला आता समजले होते की, सावज आपल्या जाळ्यात आलंय. बस! त्याला आता अडकवून ठेवायचे होते. त्यासाठी तिने दुसरा फासा टाकला.
एके दिवशी पाटलांना फोन करून अवंतिकाने डीपी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे निमंत्रण दिले. पाटील तत्काळ तयार झाले. दोघांची हॉटेलमध्ये भेट झाली. नजरेला नजर भिडताच अवंतिकाने आपला तिसरा फासा टाकला. ‘तुम्ही मला खूप आवडता. आपण लॉजवर भेटूया का?’ पाटील देखील आता अवंतिकाच्या मोहजालात अडकले होते. त्यांनी लगेच आपला होकार कळवून टाकला. दुसर्या दिवशी ते ठरल्याप्रमाणे अलका टॉकीज चौकातील एका लॉजवर दुपारी पोहोचले.
तेथे त्यांनी एक खोली बुक केली. दुपारी तीनच्या सुमारास अवंतिका लॉजवर पोहोचली. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर पाटील बाथरूममध्ये गेले. दुपारचे सव्वातीन वाजले होते. तेवढ्यात खोलीची बेल वाजली. पाटलांनी खोलीचे दार उघडताच एक पुरुष आणि दोन महिला अशा तिघांनी खोलीत प्रवेश केला. पुरुषाने तो पोलिस असून इतर दोन महिला या महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या असल्याची ओळख करून दिली. तिघांनी पाटलांना बेदम चोप दिला. शिव्यांची लाखोली वाहिली. तुला बायको नाही का, तुझी धिंड काढतो. तू चल पोलिस स्टेशनला. तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, असा दम दिला.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे पाटलांची चांगलीच तारांबळ उडाली. काय करावे हे सुचेनासे झालंं. थोडेसे सावरल्यावर त्यांनी अवंतिकाकडे पाहिले. त्यावेळी ती म्हणाली, हे माझ्यावर बळजबरी करतायत. अवंतिकाने पलटी मारताच पाटलांचे अवसान गळाले. पाटील हात जोडून विनंती करत होते. परंतु टोळीला त्यांचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. गेल्या पंधरा दिवसापासून तर ते त्याची तयारी करत होते. अवंतिकाने एक एक फासा टाकून पाटलांना आपल्या जाळ्यात खेचून इथपर्यंत आणले होते.
टोळीने पाटलांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. शेवटी तीन लाख रुपयांवर व्यवहार ठरला. पाटील यांच्याकडील वीस हजारांची रोकड त्यांनी काढून घेतली. त्यानंतर आणखी पैसे घेण्यासाठी मोटारीत डांबून कर्वे पुतळा परिसरात घेऊन गेले.