

नांदगाव (नाशिक) : पुर्ववैमनस्यातून टोळक्याने किशोरवयीन मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील वखारी शिवारात बुधवारी (दि. २३) रात्री घडली. रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे (१७, रा. बोधे दहिवाळ ता. मालेगाव) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
वाखारी शिवारात गुरुवारी (दि. २४) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात बेवारस मृतदेह मिळून आला होता. मनमाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठत पंचनामा केला. परिसरात चौकशी करुन मयताची ओळख पटवून त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मयताचे वडिल दीपक दशरथ अहिरे यांनी फिर्याद नोंदवली. त्यांनी आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे आणि रवींद्र अंकुश गायकवाड (सर्व राह. मोरवाडी साकोरी झाप ता. मालेगाव) या पाच जणांविरुद्ध संशय वर्तविला. त्यानुसार पथकाने तपासाची चक्रे फिरवत पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रवींद्र आणि संशयितांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. याच रागातून संशयितांनी त्याची हत्या केल्याचा संशय आहे. टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
नाशिक : वारंवार धमकावणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतुल अजय सिंग (२४, रा. शिवनेरी चौक, सातपूर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पवन नथू पगारे (२२, रा. सातपूर कॉलनी) याचा खून केला होता.
अतुल आणि पवन दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. दि. १ जून २०२२ रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास कॅनॉल रोड परिसरातून दोघेही अतुलच्या वडिलांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पवन हा अतुलला नेहमीप्रमाणे 'तू भयट्या आहेस, तू मला घाबरत जा' तसेच अतुलसह त्याच्या आई- वडिलांना मारून टाकेन असे धमकावले होते. त्याचा राग आल्यामुळे अतुलने पवनवर चाकूने वार करून खून केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. शिरीष कडवे यांनी युक्तिवाद केला. गुन्हा शाबित झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी पवनच्या खुनप्रकरणी अतुलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.