

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेरा दिवसांपूर्वी घडलेल्या १३ वर्षीय तेजस महाजन हत्याकांडातील प्रकरणात नरबळीचा संशय व्यक्त करत शुक्रवार (दि.27) रोजी आज रिंगणगाव व परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त मोर्चा काढला. नरबळीचे कलम लावावे, प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, तपास सीआयडीकडे सोपवावा आणि ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनासमोर मांडल्या.
खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी संतप्त होत पायी मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेला. मोर्चाप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तेजस महाजन (वय १३) याचा मृतदेह रिंगणगाव-खर्चे रस्त्यालगतच्या एका पडक्या शेतात काटेरी झुडपात आढळून आला होता. संशयित आरोपीने तेजसवर कोठेही वार न करता केवळ गळ्यातील कंठ काढून घेतला. त्यामुळे हा नरबळी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तेजसच्या वडिलांना १२ वर्षांनंतर पुत्ररत्न प्राप्त झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांत अधिक शोककळा पसरली. या हत्येला नरबळीचा संदर्भ असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिस नरबळीच्या शक्यतेला महत्त्व देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नरबळी विरोधात ग्रामस्थांनी हे आंदोलन पुकारले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर केवळ मर्यादित लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात आल्याने ग्रामस्थांनी बाहेरच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर आरडीसी पाटोळे स्वतः बाहेर येत उपस्थित होत त्यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी हे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी पाटोळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून या प्रकरणात नरबळीचे कलम लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हे कलम नेमके केव्हा लावले गेले? याचा खुलासा न झाल्याने ग्रामस्थांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच कलम लावले गेले असेल, तर मोर्चाची गरज का भासली, असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला.