Ganeshotsav Special Article | रूप गणेशाचे...!

Ganeshotsav Special Article |
Ganeshotsav Special Article | रूप गणेशाचे...!
Published on
Updated on

ह.भ.प. देवदत्त परुळेकर

सर्व विद्या आणि कलांचा अधिपती, बुद्धीचा देव आणि विघ्नहर्ता म्हणून आपण गणपतीकडे पाहतो; पण ज्या मंगलमूर्तीची आपण वर्षानुवर्षे पूजा करतो, त्याच्या जन्माच्या आणि रूपाच्या कथा मात्र विलक्षण रंजक आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाला केलेले वंदन तर आणखी व्यापक आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या मुळाशी असलेल्या नादाचे प्रतीक म्हणूनही गणेशाकडे पाहिले जाते. उद्यापासून (दि. १४ सप्टेंबर) होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने विशेष लेख!

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची चाहूल लागली की, वातावरणातच एक वेगळी ऊर्जा संचारते. घराघरांत तयारी सुरू होते, बाजारपेठा सजतात, ढोल-ताशांचा नाद घुमतो आणि प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता असते, ‘बाप्पा कधी येणार?’

सर्व विद्या आणि कलांचा अधिपती, बुद्धीचा देव आणि विघ्नहर्ता म्हणून आपण गणपतीकडे पाहतो; पण ज्या मंगलमूर्तीची आपण वर्षानुवर्षे पूजा करतो, त्याच्या जन्माच्या आणि रूपाच्या कथा मात्र विलक्षण रंजक आहेत. या कथांमध्ये कधी तो विघ्ने निर्माण करणारा आहे, कधी रावणाला थांबवणारा चतुर बालक आहे, तर कधी मातीपासून घडवलेला आणि हत्तीचे मुख धारण केलेला पार्वतीचा पुत्र आहे.

गणेशाच्या या कथांचा मागोवा घेतला की, काही प्रश्न मनात येतात.

-विघ्नकर्ता गणेश पुढे विघ्नहर्ता कसा झाला? विवाहाआधीच गणेश कुठून आला?

गणेश हा शिव-पार्वतीचा पुत्र. हे सर्वश्रुत आहे; पण मग शिव-पार्वतीच्या विवाहापूर्वीच गणेशाचे पूजन कसे झाले?

तुलसीदासांच्या 'रामचरितमानस'मध्ये या प्रसंगाचे वर्णन येते-

'मुनि अनुसासन गनपतिहि पूजेउ संभु भवानि।

कोउ सुनि संसय करै जनि सुर अनादि जियँ जानि॥'

मुनींच्या आज्ञेने शिव आणि पार्वती यांनी गणपतीची पूजा केली. हा विरोधाभास वाटतो; पण तुलसीदास त्याचे उत्तर देतात, देवता अनादि आहेत. त्यांना आदि-अंत नाही. त्यामुळे गणेशाला केवळ शिव-पार्वतीचा पुत्र म्हणून पाहायचे नाही. त्यामागील व्यापक दैवतकल्पना समजून घ्यायची आहे.

हीच गणेशाच्या कथांची गंमत आहे. कथा एका पातळीवर असते आणि तिचा अर्थ त्यापेक्षा खोलवर जातो.

गणांचा नायक आणि ओंकार

‘गणपती’ म्हणजे गणांचा प्रमुख. प्राचीन भारतात राजेशाहीच्या आधी विविध समूह किंवा ‘गण’ अस्तित्वात होते. त्या गणांच्या नेतृत्व करणाऱ्या नायकाला ‘गणपती’ म्हटले जात असावे, अशी एक अभ्यासकांची मांडणी आहे. हत्तीच्या सामर्थ्याने आणि मानवी समाजाला असलेल्या त्याच्या आकर्षणामुळे पुढे ‘गजानन’ ही दैवतप्रतिमा विकसित झाली असावी. हत्तीचे मोठे मस्तक, विलक्षण स्मरणशक्ती, सामर्थ्य आणि शांत पण प्रभावी व्यक्तिमत्त्व या सगळ्यांचा संबंध बुद्धी आणि विवेकाशी सहज जोडला गेला.

ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाला केलेले वंदन तर आणखी व्यापक आहे—

'ॐ नमो जी आद्या।

वेद प्रतिपाद्या।

जय जय स्वसंवेद्या।

आत्मरूपा॥'

येथे गणेश केवळ एखादी व्यक्ती किंवा देवता राहत नाही. तो ‘ॐ’ या आद्यनादाशी जोडला जातो. विश्वाच्या उत्पत्तीच्या मुळाशी असलेल्या नादाचे प्रतीक म्हणून गणेशाकडे पाहिले जाते.

म्हणजे एका छोट्याशा गणेशमूर्तीत गणनायक, बुद्धीचे प्रतीक आणि विश्वाच्या आद्यनादाची कल्पना एकत्र येते.

रावणालाही अडवणारा बाप्पा

गणेशाच्या या चतुर रूपाची कथा गोकर्णाशी जोडली जाते.

रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता. त्रिसंध्येच्या वेळी त्याला ते लिंग खाली ठेवणे आवश्यक होते. त्याने ते एका बालकाच्या म्हणजे गणेशाच्या हाती दिले. गणेशाने तीन वेळा हाका मारल्या आणि रावण येण्याआधीच लिंग जमिनीवर ठेवले.

रावणाने ते उचलण्याचा प्रयत्न केला; पण लिंग जमिनीत घट्ट रुतले. या आख्यायिकेतून गोकर्ण महाबळेश्वराच्या पवित्र क्षेत्राची कथा सांगितली जाते. रावणाने संतापून गणेशाच्या मस्तकावर प्रहार केला म्हणून गोकर्णातील गणेशमूर्तीच्या डोक्यावर टेंगुळ असल्याची लोकश्रद्धा आहे.

मातीचा बालक आणि गजानन

गणेशाच्या जन्माची सर्वाधिक परिचित कथा शिवपुराणाशी संबंधित आहे.

पार्वतीने स्नानाला जाण्यापूर्वी आपल्या अंगावरील उटी आणि लेपनापासून एका बालकाची मूर्ती तयार केली. तिने त्यात प्राण फुंकले आणि दारावर पहारा देण्याची आज्ञा केली.

शिव आले; पण बालकाने आईची आज्ञा पाळत त्यांना अडवले. संघर्ष झाला आणि शिवाच्या क्रोधात त्याचे मस्तक छेदले गेले. पार्वतीच्या आक्रोशानंतर शिवाने हत्तीचे मस्तक आणून त्या बालकाला पुन्हा जिवंत केले.

गजाचे आनन मुख म्हणून लागले, म्हणून तो झाला ‘गजानन’.

मातीपासून घडवलेल्या या गणेशाच्या स्मरणातूनच ‘पार्थिव गणपती’च्या पूजेची परंपरा जोडली जाते. मातीपासून देवत्वाची निर्मिती आणि पुन्हा त्याच मातीत विलीन होणे, यात जीवनाचे एक गहिरे चक्र सामावलेले आहे.

विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता

आज ‘विघ्नहर्ता’ हे गणेशाचे सर्वाधिक लोकप्रिय रूप आहे; पण प्राचीन परंपरांमध्ये विनायकाचे एक वेगळे रूप आढळते, विघ्ने निर्माण करणारे!

‘विनायक’ या नावाशी विघ्न निर्माण करणाऱ्या शक्तीची कल्पना जोडलेली आहे. देव-असुरांच्या संघर्षात असुरांच्या कार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी विनायकांची निर्मिती झाल्याची कथा सांगितली जाते; पण नंतर हेच विनायक देवांनाही त्रास देऊ लागले.

देवांनी मग शिवाचा आश्रय घेतला. शिवाच्या हास्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झाले आणि त्यानंतर अनेक विनायकगण निर्माण झाले. शिवाने त्या तेजस्वी बालकाला या गणांचा नायक केले आणि त्याला प्रथम पूजेचा अधिकार दिला. इथे एक सुंदर कल्पना दडलेली आहे. विघ्न निर्माण करणाऱ्या शक्तीला संपवायचे नाही, तर तिला नियंत्रित करून विधायक दिशेने वळवायचे.

ज्या शक्तीवर नियंत्रण नसते ती विघ्न ठरते. तिचे नियमन झाले की, तीच शक्ती रक्षण करते. त्यामुळे विघ्नकर्ता विनायक हळूहळू विघ्नहर्ता गणेश झाला.

कृष्णरूप गणेश

ब्रह्मवैवर्त पुराणात गणेशाच्या जन्माची आणखी एक वेगळी कथा येते.

पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी पुण्यक व्रत केले. व्रताच्या शेवटी श्रीकृष्ण तिच्यासमोर प्रकट झाले. पार्वतीने त्यांना आपला भाऊ मानून पुत्ररूपाने येण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने ती इच्छा मान्य केली.

कथेनुसार, पार्वतीच्या गर्भातून जन्मलेले बालक साक्षात श्रीकृष्णच होते. म्हणूनच पुराणात म्हटले आहे-

'कृष्ण एव हि गणेशोऽयं, गणेशो कृष्ण एव च।'

अर्थात, कृष्ण आणि गणेश हे वेगळे नाहीत.

पुढे शनीदेवांच्या वक्रदृष्टीमुळे त्या बालकाचे मस्तक नष्ट झाले आणि विष्णूंनी हत्तीचे मस्तक आणून ते बालक पुन्हा जिवंत केले, अशी या परंपरेतील कथा आहे.

कथा वेगवेगळ्या आहेत. जन्मकथा वेगवेगळ्या आहेत; पण प्रत्येक कथेतून गणेशाचे एखादे नवे रूप समोर येते.

गणेशोत्सवाचा खरा अर्थ

म्हणूनच गणेशोत्सव हा केवळ मूर्तीची स्थापना आणि विसर्जन एवढ्यापुरता मर्यादित नाही. तो माणसाने स्वतःकडे पाहण्याचा उत्सव आहे.

मातीपासून तयार झालेली मूर्ती आपल्याला नश्वरतेची जाणीव करून देते. हत्तीचे मस्तक विवेक आणि सामर्थ्याची आठवण करून देते. ‘ॐ’ विश्वाच्या आद्यनादाशी आपले नाते सांगतो. विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हा प्रवास आपल्याला आपल्या आतल्या अडथळ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा संदेश देतो.

दरवर्षी आपण बाप्पाला घरी आणतो आणि काही दिवसांनी निरोप देतो; पण त्या काळात एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, बाप्पाचे विसर्जन करताना आपल्या मनातली कोणती विघ्ने आपण विसर्जित करणार आहोत? कदाचित गणेशोत्सवाचा खरा उत्सव तिथेच सुरू होतो.

logo
Pudhari News
pudhari.news