Bluebird Block-2 satellite | जागतिक कनेक्टिव्हिटीचे नवे पर्व

Bluebird Block-2 satellite
Bluebird Block-2 satellite | जागतिक कनेक्टिव्हिटीचे नवे पर्वFile Photo
Published on
Updated on

प्रा. विजया पंडित

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एलव्हीएम 3-एम 6 रॉकेट वापरून ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित केला आहे. या उपग्रहाचे वजन 4,100 किलोग्रॅम असून भारताने प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे. ज्या रॉकेटवर तो प्रक्षेपित करण्यात आला त्याचे वजन 640 टन आहे, ज्यामुळे तो भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन बनला आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या शिरपेचात 24 डिसेंबर रोजी मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘एलव्हीएम-3 एम6’ हे महाकाय रॉकेट आकाशात झेपावले आणि भारताच्या जागतिक अंतराळ वर्चस्वाचा आणि भविष्यातील दळणवळण क्रांतीचा नवा अध्याय लिहिला गेला. अमेरिकेतील ‘एएसटी स्पेसमोबाईल’ या जागतिक कीर्तीच्या कंपनीसोबत झालेल्या व्यावसायिक करारानुसार, ‘ब्लू बर्ड ब्लॉक-2’ हा अमेरिकन उपग्रह अवकाशात झेपावला आहे. या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारताचा ‘बाहुबली’ म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम-3 हे रॉकेट. अफाट शक्ती, अचूकता आणि प्रचंड वजन वाहून नेण्याची क्षमता यामुळे या रॉकेटला मिळालेले हे बिरूद आज जगासाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. सुमारे 4,410 किलो वजनाचा हा महाकाय संवाद उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करणे हे तांत्रिकद़ृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक काम होते; मात्र ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी आपल्या सातत्यपूर्ण संशोधनातून ही किमया साधली आहे. भारतीय भूमीतून भूस्थिर कक्षेत सोडलेला आतापर्यंतचा हा सर्वात वजनदार पेलोड ठरला आहे.

भारत आता केवळ उपग्रह प्रक्षेपित करणारा देश राहिला नसून, अत्यंत गुंतागुंतीच्या आणि लवचिक अंतराळ मोहिमा राबवणारा देश म्हणून पुढे आला आहे. यामुळे भविष्यात चंद्रावर किंवा मंगळावर मानवी मोहिमा पाठवताना लागणारी तांत्रिक पायाभरणी आजच भक्कम होत आहे. बाहुबली रॉकेटची ही शक्ती भारताच्या स्वावलंबनाचा आणि ‘मेक इन इंडिया’च्या यशाचा हुंकार आहे.

‘ब्लू बर्ड ब्लॉक-2’ या उपग्रहाचे वेगळेपण म्हणजे तो थेट तुमच्या खिशातील स्मार्ट फोनशी संवाद साधणार आहे. आजपर्यंत आपण सॅटेलाईट फोनबद्दल ऐकले आहे, जे अत्यंत महागडे आणि विशिष्ट उपकरणांची गरज भासणारे असत; मात्र एएसटी स्पेसमोबाईलने विकसित केलेले हे तंत्रज्ञान सामान्य मोबाईल यूजर्ससाठी क्रांती ठरणार आहे. कोणत्याही जमिनीवरील टॉवरशिवाय थेट अंतराळातून वापरकर्त्याच्या फोनवर हायस्पीड इंटरनेट आणि सेल्युलर ब्रॉडबँड पोहोचवण्याचे स्वप्न यामुळे प्रत्यक्षात येणार आहे. सध्या जगात सुमारे 6 अब्ज लोक मोबाईल वापरतात; मात्र अजूनही अनेक दुर्गम भाग, खोल समुद्र आणि पर्वतरांगांमध्ये नेटवर्कची मोठी समस्या जाणवते. ही मोहीम या समस्येचे कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी आखली गेली आहे. जेव्हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये अशा उपग्रहांचा समूह कार्यान्वित होईल, तेव्हा जगातील कानाकोपर्‍यांत इंटरनेट पोहोचेल आणि डिजिटल दरी कायमची मिटलेली असेल.

‘इस्रो’चे एलव्हीएम-3 हे केवळ एक रॉकेट नसून ते भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा एक अजोड नमुना आहे. या रॉकेटला ‘बाहुबली’ का म्हटले जाते, हे समजून घेण्यासाठी त्याच्या अंतर्गत रचनेचा आणि तीन टप्प्यांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. हे रॉकेट प्रामुख्याने जड उपग्रहांना पृथ्वीच्या भूस्थिर संक्रमण कक्षेत पोहोचवण्यासाठी विकसित केले गेले आहे. याची उंची सुमारे 43.5 मीटर असून त्याचे वजन साधारणपणे 640 टन इतके प्रचंड आहे. या महाकाय वजनाला गुरुत्वाकर्षणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीच्या अशा ‘थ्री-स्टेज’ इंजिनिअरिंगचा वापर करण्यात आला आहे. ही रचना अशाप्रकारे केली गेली आहे की, प्रत्येक टप्पा विशिष्ट उंचीवर रॉकेटला वेग आणि दिशा देण्याचे काम चोखपणे पार पाडतो.

या रॉकेटच्या पहिल्या आणि सर्वात शक्तिशाली टप्प्यात दोन मोठ्या एस 200 सॉलिड रॉकेट बूस्टर्सचा समावेश असतो. हे बूस्टर्स रॉकेटच्या मुख्य भागाला दोन्ही बाजूंनी जोडलेले असतात. यामध्ये घन इंधनाचा वापर केला जातो. जेव्हा रॉकेट प्रक्षेपणाच्या वेळी उड्डाण करते, तेव्हा सर्वात आधी हे दोन बूस्टर्स प्रज्वलित होतात. या बूस्टर्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते उड्डाणानंतरच्या पहिल्या काही मिनिटांत प्रचंड ऊर्जा निर्माण करतात. यामुळे हजारो टन वजनाचे हे रॉकेट जमिनीवरून वर उचलले जाते. या बूस्टर्सची निर्मिती ‘इस्रो’ने अत्यंत विचारपूर्वक केली आहे. कारण, घन इंधन एकदा प्रज्वलित झाले की, ते पूर्णपणे जळाल्याशिवाय थांबवता येत नाही. हे बूस्टर्स रॉकेटला प्राथमिक वेग मिळवून देतात आणि ठरावीक उंचीवर गेल्यावर ते मुख्य रॉकेटपासून वेगळे होतात. यानंतर दुसर्‍या टप्प्याची म्हणजे एल110 या कोअर स्टेजची जबाबदारी सुरू होते. या टप्प्यात द्रव इंधन वापरणार्‍या दोन ‘विकास’ इंजिनचा वापर केला जातो. विकास इंजिन हे भारतीय अंतराळ विज्ञानाचा कणा मानले जाते. या इंजिनमध्ये इंधनाचा प्रवाह नियंत्रित करण्याची सोय असल्याने रॉकेटची गती आणि दिशा अत्यंत अचूकपणे सांभाळली जाते. द्रव इंधनाचा हा टप्पा रॉकेटला वातावरणाच्या दाट थरातून बाहेर काढण्यासाठी मदत करतो. रॉकेट अंतराळाच्या उंबरठ्यावर पोहोचते, तेव्हा हा दुसरा टप्पाही वेगळा होतो. इंजिनिअरिंगच्या द़ृष्टीने हा भाग अत्यंत कठीण असतो. कारण, येथे इंधनाचे ज्वलन आणि दाब यांचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असते.

या रॉकेटचे खरे वैशिष्ट्य आणि यशाचे गुपित त्याच्या तिसर्‍या टप्प्यात दडलेले आहे. याला ‘सी 25’ क्रायोजेनिक अप्पर स्टेज म्हटले जाते. क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे जगातील सर्वात जटिल तंत्रज्ञानांपैकी एक मानले जाते. यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांसारख्या वायूंना अत्यंत कमी तापमानावर (उणे 250 अंश सेल्सिअसच्या खाली) द्रव स्वरूपात साठवले जाते. हे इंधन इतर इंधनांच्या तुलनेत प्रचंड ऊर्जा देत असल्यामुळे जड उपग्रहांना अंतराळातील शेवटच्या कक्षेपर्यंत पोहोचवणे सोपे होते. भारताला हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी अनेक दशके संघर्ष करावा लागला; मात्र आज ‘इस्रो’कडे स्वतःचे स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन आहे. ‘ब्लू बर्ड ब्लॉक-2’ सारख्या उपग्रहाला अचूक ठिकाणी स्थापित करण्यासाठी या क्रायोजेनिक इंजिनची ताकद आणि स्थिरता निर्णायक ठरते. या टप्प्यात इंजिन पुन्हा प्रज्वलित करण्याची क्षमता असल्यामुळे एकाच मोहिमेत एकापेक्षा जास्त उपग्रह वेगवेगळ्या कक्षांत सोडणे शक्य झाले आहे.

या रॉकेटची बाह्य रचना आणि ‘पेलोड फेअरिंग’ (रॉकेटचे वरचे टोक जिथे उपग्रह ठेवला जातो) हेदेखील महत्त्वाचे आहे. जेव्हा रॉकेट हवेचा विरोध झेलत वेगाने वर जाते, तेव्हा उपग्रहाचे रक्षण करण्यासाठी हे आवरण कवच म्हणून काम करते. अंतराळात पोहोचल्यानंतर हे आवरण दोन भागांत विभागले जाते आणि आतील उपग्रह मोकळा होतो. या संपूर्ण प्रक्रियेत रॉकेटमध्ये बसवलेले ‘ऑन बोर्ड कॉम्प्युटर्स’ आणि नेव्हिगेशन यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावतात. हे कॉम्प्युटर्स प्रति सेकंदाला हजारो आकडेमोड करून रॉकेटचा मार्ग निश्चित करतात. हवेच्या दाबामुळे किंवा इंधनाच्या ज्वलनामुळे मार्गात थोडाही बदल झाला, तर ही यंत्रणा त्वरित सुधारणा करते. या तंत्रज्ञानामुळेच भारत आज जगात अंतराळ व्यापारात आघाडीवर असून, भविष्यातील गगनयान मोहिमेसाठीदेखील याच ‘बाहुबली’ रॉकेटची निवड करण्यात आली आहे.

व्यावसायिक द़ृष्टिकोनातून पाहिले, तर ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ने जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली आहे. पूर्वी भारत पाश्चिमात्य देशांच्या उपग्रहांवर अवलंबून होता; मात्र आज अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील बड्या कंपन्या आपल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी भारताची निवड करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे भारताची विश्वासार्हता आणि किफायतशीर दर. अमेरिकेतील नामांकित कंपनीने आपल्या महत्त्वाकांक्षी उपग्रहासाठी भारताच्या ‘बाहुबली’ची निवड करणे, हा भारताच्या तांत्रिक गुणवत्तेबाबत दाखवलेला विश्वास आहे. एएसटी स्पेसमोबाईलने जगभरातील 50 हून अधिक आघाडीच्या मोबाईल ऑपरेटर्ससोबत करार केले असून त्याचा फायदा भविष्यात भारतीय दूरसंचार क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर होईल.

सीएमएस-03 च्या माध्यमातून भारताचे सामरिक सामर्थ्यही वृद्धिंगत होणार आहे. सुरक्षित आणि मल्टि-बँड कम्युनिकेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराला आणि सामरिक यंत्रणांना अद्ययावत माहिती पुरवणे सोपे होईल. महासागरांमध्ये गस्त घालणार्‍या युद्धनौकांपासून ते हिमालयातील दुर्गम चौक्यांवरील जवानांपर्यंत प्रत्येकाला या हायस्पीड तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. भारताची भौगोलिक रचना पाहता आपल्याकडे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जमिनीवरील दळणवळण यंत्रणा कोलमडून पडते. अशा ठिकाणी हे अंतराळ आधारित नेटवर्क संजीवनी ठरू शकते. त्यामुळे ही मोहीम केवळ एका कंपनीचा नफा वाढवणारी नसून, राष्ट्रीय सुरक्षेच्या द़ृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘बाहुबली’चा हा प्रवास भारताच्या जिद्दीचा प्रवास आहे. ज्या देशाने सायकलीवरून रॉकेटचे सुटे भाग नेले होते, तोच देश आज 4,500 किलोचे उपग्रह घेऊन अवकाशात झेपावत आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. भारतीय तंत्रज्ञांच्या, संशोधकांच्या प्रतिभाशक्तीचे आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक म्हणून याकडे पाहावे लागेल. या मोहिमेमुळे जागतिक कनेक्टिव्हिटीचे जे नवे दालन उघडणार आहे, त्याचे दूरगामी परिणाम शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि व्यापार या सर्वच क्षेत्रांवर होतील. सॅटेलाईट ब्रॉडबँडच्या या युगात भारत आता केवळ एक प्रेक्षक न राहता खंबीर नेतृत्व करणारा देश म्हणून उभा ठाकला आहे. या मोहिमेच्या यशानंतर मोबाईल क्रांतीचा दुसरा टप्पा सुरू होईल. या टप्प्यात ‘नेटवर्क नाही’ हा शब्द कदाचित इतिहासजमा होईल. कोणतेही तंत्रज्ञान जेव्हा प्रयोगशाळेतून बाहेर पडून तळागाळापर्यंत त्याचे लाभ पोहोचतात तेव्हाच त्या संशोधनाचे सार्थक होते आणि ही मोहीम नेमके तेच काम करणार आहे. यामुळे निर्माण होणारी ‘कनेक्टिव्हिटी’ भविष्यात भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मुख्य महामार्ग ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news