Shravan 2026
मुंबई : श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेइतकाच कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरेनुसार, श्रावण महिन्यात विवाहित मुलींनी माहेरी येणे अत्यंत शुभ मानले जाते. या परंपरेमुळे मुलीचे माहेराशी असलेले नाते अधिक घट्ट होते, तसेच घरात आनंद, सौख्य आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते, अशी मान्यता आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, विवाहानंतर श्रावण महिन्यात विवाहित मुलीने एकदा तरी माहेरी यावे. असे केल्याने केवळ मुलीला भावनिक आधार मिळत नाही, तर संपूर्ण कुटुंबालाही मानसिक समाधान मिळते. मुलीच्या लग्नानंतर माहेर काहीसे ओस पडल्याची भावना अनेक घरांमध्ये असते. अशा वेळी श्रावणात तिच्या आगमनामुळे घरात पुन्हा उत्साह, आनंद आणि चैतन्य निर्माण होते.
अनेक कुटुंबांमध्ये आजही ही परंपरा जपली जाते. अशा घरांमध्ये मुलीचे सौभाग्य कुटुंबाच्या सुख-समृद्धी आणि प्रगतीस कारणीभूत ठरते, अशी श्रद्धा आहे. ही परंपरा नवविवाहित मुलींसाठी विशेष मानली जात असली, तरी अनेक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलादेखील तिचे पालन करू शकतात.
श्रावण महिन्यात मुलगी सासरहून माहेरी आल्यावर तिचे स्वागत साधेपणाने आणि मंगल वातावरणात करण्याची परंपरा आहे. घराच्या उंबरठ्यावर तिची औक्षण करून स्वागत करावे. कपाळावर कुंकू, अक्षता आणि चंदनाचा टिळा लावावा. स्वच्छ पाण्याने तिचे पाय धुऊन आदराने पुसावेत. पारंपरिक गोड पदार्थ खाऊ घालून तिचे तोंड गोड करावे. तिच्या हस्ते घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
श्रावणातील ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून, मुलगी आणि तिच्या माहेरातील भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा सुंदर संदेश देते. बदलत्या काळातही अनेक कुटुंबे ही प्रथा जपताना दिसतात. त्यामुळे श्रावण हा केवळ भक्तीचा नव्हे, तर प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक नात्यांचा सण मानला जातो.