

Akshaya Tritiya Puja Muhurat Gold Buying Timings
मुंबई: हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाणारी आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेली अक्षय्य तृतीया यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी होत आहे. 'अक्षय्य' या शब्दाचा अर्थ 'कधीही न संपणारा' असा होतो. म्हणूनच असे म्हटले जाते की, 'अक्षय्यतृतीया' हा असा सण आहे की, ज्याचे भाग्य आणि शुभ फल कधी संपुष्टात येत नाही. या दिवशी सुरू केलेले कार्य माणसाला जीवनभर कधीच नष्ट न होणारे शुभ फल प्रदान करते.
यंदा अक्षय्य तृतीयेचा सण रविवारी येत असून, पूजेसाठी आणि शुभ कार्यांसाठी दीड तासाचा विशेष मुहूर्त लाभला आहे.
पूजा मुहूर्त: सकाळी १०:४९ ते दुपारी १२:२० पर्यंत
कालावधी: १ तास ३२ मिनिटे
तृतीया तिथी प्रारंभ: १९ एप्रिल, सकाळी १०:४९ वाजता
तृतीया तिथी समाप्ती: २० एप्रिल, सकाळी ०७:२७ वाजता
मुंबईमध्ये पूजेचा मुहूर्त सकाळी १०:४९ ते दुपारी १२:३८ पर्यंत असेल, तर पुण्यातही स्थानिक सूर्योदयानुसार यात किरकोळ बदल असू शकतो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या दिवशी सोने खरेदीसाठी दिवसभरात विविध शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत (वेळ, मुहूर्त प्रकार):
सकाळी १०:४९ ते दुपारी १२:२० (चल, लाभ, अमृत)
दुपारी ०१:५८ ते दुपारी ०३:३५ (शुभ)
संध्याकाळी ०६:४९ ते रात्री १०:५७ (शुभ, अमृत, चल)
मध्यरात्री ०१:४३ ते पहाटे ०३:०५ (२० एप्रिल) (लाभ)
पहाटे ०४:२८ ते सकाळी ०५:५१ (२० एप्रिल) (शुभ)
या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने सहकार्य केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. महर्षी व्यासांनी श्री गणेशाच्या सहाय्याने महाभारतासारखे महान काव्य रचले. त्याप्रमाणे वर्तमान युगातही नव्या ज्ञानरचना या पवित्र दिवसाच्या शुभमुहूर्तावर केल्या पाहिजेत, असा आग्रह धरला जातो तो सार्थ होय.
विष्णूने परशुरामाच्या रूपात या दिवशी अवतार घेतला होता. अन्य आख्यायिकांनुसार, त्रेतायुग सुरू झाल्यानंतर पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाली. श्री अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवसही अक्षय्यतृतीया हाच मानला जातो. म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा देवीचे पूजन केले जाते.
दक्षिणेत या दिवसासंबंधी काही वेगळ्या कथा सांगितल्या जातात. तेथील मान्यतांनुसार, देवांचे खजिनदार कुबेर यांनी शिवपुरम येथे शंकराची आराधना करून या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकराने कुबेराला वरदान मागण्यास सांगितले. आपले धन आणि संपत्ती लक्ष्मीकडून आपणास परत मिळावी, असे वरदान कुबेराने मागितले, तेव्हा शंकराने कुबेराला श्रीलक्ष्मीची आराधना करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून आजअखेर दरवर्षी अक्षय्यतृतीयेला श्रीलक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पूजागृहात श्रीविष्णू, श्रीलक्ष्मी यांच्यासमवेत श्रीकुबेराचेही चित्र लावले जाते.
अक्षय्यतृतीयेलाच महाभारत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ झाल्याचे मानले जाते. याच दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला 'अक्षय्य पात्र' मिळाले होते. या पात्राचे वैशिष्ट्य असे की, यातील भोजन कधीही संपत नसे. या पात्राच्या सहाय्याने युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरिबांना आणि भुकेल्या लोकांना भोजन देऊन मदत करीत असे. त्यामुळेच या दिवशी केला जाणारा दानधर्म महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी केलेल्या पुण्याचे फळ कधीच न संपणारे असते, असे मानले जाते. दानशूर माणसाचे भाग्य या दिवशी केलेल्या दानामुळे वर्षांनुवर्षे वाढतच राहते. महाभारतात अक्षय्यतृतीयेसंबंधी आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. दुःशासनाने याच दिवशी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला कधीही न संपणारे वस्त्र प्रदान केले होते. अक्षय्यतृतीयेसंबंधी आणखी एक रोचक कथा सांगितली जाते.