पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२०२५साठी अर्थसंकल्प सादर करताना सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी Angel Tax (एंजल टॅक्स) रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. हा टॅक्स रद्द करण्यात आल्याने देशातील स्टार्टअपमध्ये समाधानाचे वातावरण आहे, शिवाय हा कर रद्द केल्यामुळे गुंतवणुकदारही स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील, असे मानले जात आहे. (What is angel tax in India)
भारतात सध्या ३०.६ टक्के इतका Angel Tax आकारला जातो. हा कर भारतातील स्टार्टअपच्या वाढीत अडथळा ठरत होता, हा कर रद्द होणे देशातील स्टार्टअपच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार असल्याचे द वीक या नियतकालिकाच्या वेबसाईटने म्हटले आहे.
शेअर बाजारात नोंदणी नसलेली (Unlisted) भारतातील कंपनी जेव्हा गुंतवणुकदारांना स्वतःचे शेअर्स देऊ करते, आणि या शेअर्सची किंमत जर Fair Market Value पेक्षा जास्त असते, तेव्हा यावर Angel Tax आकारला जातो. हा कर ३०.६ टक्के इतका आहे.
समजा एखाद्या स्टार्टअपला बाहेरच्या गुंतवणुकदारांकडून गुंतवणूक मिळाली तर ही गुंतवणूक इतर मार्गाने मिळालेली गुंतवणूक समजली जाते, आणि त्याला Angel Tax लागू होतो. स्टार्ट कंपन्या त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात फार मोठ्या प्रमाणावर बाह्य गुंतवणुकींवर अवलंबून असतात, आणि त्यांच्यासाठी हा कर फार मोठा बोजा होता. तर दुसरीकडे गुंतवणुकदारही या करामुळे स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करताना हात अखडता घेतात. आता हा कर रद्द केल्याची घोषणा झाल्यामुळे देशातील स्टार्टअपमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
स्टार्टअप ओडिसाचे चेअरमन डॉ. ओमकार राय म्हणाले, "स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी Angel Tax रद्द करणे, ही बजेटमधील सर्वांत चांगली तरतुद आहे. देशातील स्टार्टअप इकोसिस्टमला याचा फार चांगला लाभ होणार आहे."
तर 3One4 Capitalचे व्यवस्थापकीय भागीदार सिद्धार्थ राय म्हणाले, "हा कर भांडवलावर होता आणि त्यामुळे भांडवलनिर्मितीशी सुसंगत नव्हता. या करामुळे एक प्रकारे स्टार्टअप्सची पिळवणूक होत होती. हा कर रद्द झाल्याने स्टार्टअप्सना मोठा दिलासा मिळाला आहे."