

मारुती वि. पाटील
युद्धाची परिस्थिती अनपेक्षित आणि तणावपूर्ण असते. अशावेळी देशाबाहेर जाणे किंवा परदेशातून परत येणे एखाद्याला कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रवासी विमा (ट्रॅव्हल इन्शुरन्स) महत्त्वाचा ठरतो. मात्र, त्याच्या फायद्याबरोबरच मर्यादाही समजून घेणे गरजेचे आहे.
उड्डाणे रद्द होण्याचा धोका : युद्धकाळात अनेकदा हवाई क्षेत्र बंद केले जाते आणि विमानाची उड्डाणे रद्द होतात. योग्य ट्रॅव्हल इन्शुरन्स असल्यास तिकीट रद्द झाल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून मिळू शकते. विशेषतः ‘कॅन्सल फॉर एनी रिझन’(सीएफएआर) हा पर्याय आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
आपत्कालीन वैद्यकीय मदत : युद्धग्रस्त भागात वैद्यकीय सेवा मर्यादित असू शकतात. अचानक आजारपण किंवा दुखापत झाल्यास तत्काळ उपचार खूप महाग पडू शकतात. प्रवासी विमा अशा वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक संरक्षण देतो.
सामान आणि कागदपत्रांची सुरक्षा : गोंधळाच्या परिस्थितीत सामान हरवणे किंवा पासपोर्टसारखी कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता असते. अशावेळी नवीन कागदपत्रे काढणे आणि तात्पुरत्या खर्चासाठी विमा मदत करू शकतो.
आपत्कालीन निर्वासन (इमर्जन्सी इव्हॅकॉशन): जर कोणी युद्धग्रस्त भागात अडकले, तर सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मोठा खर्च येऊ शकतो. काही प्रीमियम पॉलिसींमध्ये ‘पॉलिटिकल इव्हॅकॉशन’ कव्हर असते, ज्यामुळे हा खर्च विमा कंपनी उचलू शकते.
युद्ध अपवादाची मर्यादा : बहुतेक विमा पॉलिसींमध्ये वॉर एस्क्लुजन क्लॉज - युद्ध अपवाद कलम असते. म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर त्या भागात जाणार्यांना विमा संरक्षण मिळेलच असे नाही. त्यामुळे तत्काळ घेतलेल्या विम्यात हे फायदे असतीलच असे नाही; पण युद्ध सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या पॉलिसीत काही फायदे मिळू शकतात. जाणीवपूर्वक युद्धग्रस्त देशात प्रवास केल्यास दावा नाकारला जाऊ शकतो. युद्धाच्या काळात प्रवासी विमा आर्थिक आणि मानसिक सुरक्षा देऊ शकतो. मात्र, प्रवासी विमा घेताना युद्ध, नागरी अशांतता आणि दहशतवाद यासंबंधीच्या अटी नीट वाचणे अत्यंत आवश्यक असते; पण तरीही अनिश्चित काळात प्रवासी विमा हा एक महत्त्वाचा बॅकअप प्लॅन ठरू शकतो.