

Tata Group Loss FY26 Air India Tata Digital: टाटा समूहासाठी आर्थिक वर्ष 2025-26 अपेक्षेप्रमाणे गेले नाही. देशातील सर्वात विश्वासार्ह आणि मजबूत उद्योगसमूह मानल्या जाणाऱ्या Tata Group ला यंदा नव्या व्यवसायांमुळे मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, टाटा सन्स अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नव्या व्यवसायांमुळे या वर्षी तब्बल 29 हजार कोटी रुपयांपर्यंत तोटा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला हा तोटा केवळ 5,700 कोटी रुपयांच्या आसपास असेल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
FY26 च्या पहिल्या नऊ महिन्यांतच सुमारे 21,700 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या (FY25) एकूण 16,550 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा जास्त आहे. या वाढत्या तोट्याची प्रमुख कारणे म्हणजे Air India, Tata Digital, Tata Electronics आणि Tejas Networks यांसारख्या व्यवसायांतील घसरण.
विशेषतः Tata Digital हा ग्रुपसाठी मोठी चिंता बनला आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये BigBasket, Tata 1mg, Croma, Tata CLiQ आणि Tata Neu यांसारख्या सेवांचा समावेश आहे. या क्षेत्रात सुमारे 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही कंपनी अद्याप नफ्यात आलेली नाही. उलट FY26 मध्येच 5,000 कोटी रुपयांहून अधिक तोटा होण्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, BigBasketसारख्या सेवांना स्पर्धकांनी मागे टाकले आहे. वितरणाची गती आणि ‘डार्क स्टोअर्स’च्या नेटवर्कमध्ये इतर कंपन्या पुढे गेल्या, तर टाटा डिजिटलने या बाबतीत अपेक्षित गुंतवणूक केली नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, Air India हा तोट्यात सर्वात मोठा वाटा उचलणारा व्यवसाय ठरत आहे. या एअरलाइनला FY26 मध्ये तब्बल 20,000 कोटी रुपयांपर्यंत तोटा होण्याची शक्यता आहे. आधीच्या अंदाजाच्या तुलनेत हा आकडा जवळपास दहापट वाढला आहे.
पहिल्या नऊ महिन्यांतच 15,000 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर टाटा समूहाच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळवाढीचा निर्णयही काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता. पुढील काळात तोटा आटोक्यात आणण्यासाठी ठोस धोरण मांडले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काही महिने या कंपन्यांच्या कामगिरीसाठी निर्णायक ठरणार आहेत.