

आपल्यासमोर नेहमीच डेट आणि वेल्थ क्रिएशनपैकी एकाची निवड करण्याचे आव्हान असते. एकीकडे गृह कर्जाचा हप्ता असतो, तर दुसरीकडे गुंतवणूक वाढविण्याचे आव्हान असते. अनेकदा यावर लोक निर्णय घेऊ शकत नाहीत. (Investment Ideas)
अतिरिक्त उत्पन्नाचा वापर हा नवीन गुंतवणुकीसाठी करायला हवा की अधिक हप्ता भरून गृह कर्ज लवकर संपविले पाहिजे, यावर मतैक्य होत नाही. स्वाती नावाची नोकरदार महिला ही अशाच प्रकारच्या विचारांत अडकली आहे.
तिची आर्थिक स्थिती पाहू. ... असे आहे प्रकरण स्वाती नावाच्या एका महिलेने एक कोटीचे गृह कर्ज घेतले आहे. तिचा मासिक हप्ता ८६ हजार रुपये आहे. हे कर्ज वीस वर्षांसाठी आहे. स्वाती ही आयटी कंपनीत असून तिला कंपनीकडून वेतनात वार्षिक २४ हजार रुपयांची वेतनवाढ मिळते. आता या वेतनवाढीच्या पैशाचे काय करावे, यावर ती निष्कर्षाप्रत पोहोचत नाही.
गृह कर्ज कमी करावे की गुंतवणुकीची पद्धत बदलावी, यावर ती निर्णय घेऊ शकत नाही. या प्रकारचा प्रश्न केवळ स्वातीपुरतीच नाही तर अनेकांसमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रश्नांचे उत्तर पाहण्यासाठी तिच्या दीर्घकाळाच्या आर्थिक नियोजनाचे आकलन करावे लागेल.
अर्थात, वेळेच्या अगोदर गृह कर्ज फेडण्याचे अनेक फायदे आहेत. याप्रमाणे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला फंड तयार होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही पर्यायांवर विचार केला पाहिजे. गृह कर्ज फेडण्यासाठी कोणता पर्याय चांगला राहू शकतो, ते आता पाहू! हप्ता ८६ हजारांवरून १ लाख १० हजार केल्याने गृह कर्जाचा कालावधी बराच कमी होऊ शकतो.
तो वीस वर्षांवरून १३.७ वर्षे राहू शकतो आणि त्यामुळे कर्जाच्या व्याजापोटी जाणारे सुमारे ३५ लाख रुपये वाचतात. ही मोठी बचत आहे. त्याचबरोबर आपल्या कर्जाची जबाबदारीदेखील कमी होते; परंतु त्याचे नुकसान म्हणजे आपण दीर्घकाळाच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या जादा परताव्याचा लाभापासून वंचित राहतो.
दुसरा पर्याय म्हणजे, स्वातीने ८६ हजार रुपयांचा हप्ता कायम ठेवला. तिने वेतनवाढीचे पैसे एसआयपीमध्ये गुंतवले. त्यावर तिला वार्षिक सहजपणे १२ टक्के परतावा मिळाला. १७ वर्षांत ती गुंतवणूक वाढवत १.६ कोटी रुपये झाली. हे अतिरिक्त वेतन तिला आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी फायदेशीर राहू शकते.
तिने हा पैसा शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तिला अधिक परतावा मिळू शकतो. गृह कर्जाच्या रिपेमेंटमुळे जबाबदारी कमी होत असल्याने स्वातीला मानसिक समाधान राहू शकते. दुसरीकडे एसआयपीतील गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात मोठा फंड तयार होतो. म्हणून या गोष्टींचे आकलन करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आणखी काही मुद्द्यांवर विचार करायला हवा.
कर आकारणी : स्वातीने गृह कर्जाच्या मुद्दलात पैसे भरल्याने वार्षिक दीड लाख रुपये आणि व्याज रिपेमेंटवर वार्षिक दोन लाख रुपयांच्या डिडक्शनवर दावा करू शकते. त्यामुळे कर्जाचा खर्च हा बराच कमी होऊ शकतो. म्हणून वेतनवाढीचा पैसा हा गुंतवणूक केल्यास अधिक फायद्याचा राह शकतो.
लिक्विडीटीः एसआयपीच्या माध्यमातून स्वातीकडे नेहमीच मोठी रकम हाताशी राहील. कर्जफेडीचा पैसा लॉक होतो. हप्तावाढीचा लाभ हा कर्ज संपल्यावरच मिळेल. तत्पूर्वी, तिला वेतनवाढीचा कोणताही फायदा मिळणार नाही.
एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर किमान दहा ते बारा टक्के परतावा मिळतो आणि हा परतावा गृह कर्जाच्या ८.५ टक्के व्याजापेक्षा अधिक आहे; मात्र एसआयपीत गुंतवणूक करताना जोखीमदेखील असते, हे लक्षात घेतले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय फायदेशीर आहे, हे तुमचे आर्थिक नियोजन आणि पार्श्वभूमीवर अवलंबून असेल.
तुम्ही आर्थिक ध्येय गाठण्याच्या अगोदरच पुरेशा प्रमाणात गुंतवणूक करत असाल, तर गृह कर्जाचे रिपेमेंट करून हप्ता वाढवू शकतो. तुम्ही आर्थिक ध्येय गाठण्यासाठी पुरेशी गुंतवणूक करत नसाल, तर तुम्ही बढतीचा पैसा हा एसआयपीच्या मार्गान गुंतवणुकीसाठी वापरू शकता
नोकरदारवर्ग वेतनवाढीचा पैसा कोठे गुंतवावा, यावरून नेहमीच द्विधा मनस्थितीत असतात. गृह कर्जाचे लवकर रिपेमेंट करावे की गुंतवणूक वाढवावी, यावरून विचारात पडलेले असतात. दोन्हीचे फायदे आणि नुकसान आहेत. नोकरदाराचे वेतन, आर्थिक स्थिती, जबाबदारी, आर्थिक ध्येय यावर पर्याय निवडता येऊ शकतो.