Nifty Crash Prediction : अरे बापरे! ‘Nifty’ ७-८ टक्क्यांनी कोसळण्याची भीती; शेअर मार्केट तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Stock Market Warning : गुंतवणूकदारांनी घाईघाईने मोठे निर्णय घेणे टाळावे, पण....
Nifty Crash Prediction : अरे बापरे! ‘Nifty’ ७-८ टक्क्यांनी कोसळण्याची भीती; शेअर मार्केट तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
Published on
Updated on

मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी आगामी काळ अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडणारी माहिती समोर आली आहे. 'इनवेस्को म्युच्युअल फंड'चे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) ताहेर बादशाह यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जागतिक अनिश्चितता आणि कंपन्यांच्या नफ्यातील घटत्या अंदाजामुळे निफ्टी-५० निर्देशांकात आगामी काळात ७ ते ८ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळू शकते.

सुमारे १४ अब्ज डॉलरहून अधिक मालमत्तेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या बादशाह यांनी 'सीएनबीसी-टीव्ही१८' ला दिलेल्या मुलाखतीत बाजाराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. त्यांच्या मते, वित्त वर्ष २०२७ साठी बाजाराने पूर्वी १३ ते १५ टक्के उत्पन्न वाढीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, बदललेल्या परिस्थितीत हा अंदाज आता ६ ते ७ टक्क्यांवर येऊन ठेपण्याची चिन्हे आहेत. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीतील अनपेक्षित उसळी आणि जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव यांमुळे कंपन्यांच्या नफ्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला असून, विश्लेषकांकडून उत्पन्नाचे अंदाज सातत्याने घटवले जात आहेत.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अधिक जोखीम

ताहेर बादशाह यांच्या विश्लेषणानुसार, निफ्टीमध्ये जरी ७-८ टक्क्यांची घसरण अपेक्षित असली, तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांना याचा मोठा फटका बसू शकतो. या श्रेणीतील समभागांमध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. बाजार अजूनही त्याच्या ‘बॉटम’पर्यंत पोहोचलेला नसून, नजीकच्या काळात अधिक कमजोरी दिसून येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. जर परिस्थिती अधिक बिकट झाली, तर बाजार 'शून्य उत्पन्न वाढी'चा विचार करून व्यवहार करू लागेल, परिणामी व्हॅल्यूएशनवर दबाव येऊन घसरणीचा परीघ अधिक विस्तारू शकतो.

परिणामांची तीव्रता कधी जाणवणार?

उत्पन्नावर होणाऱ्या या परिणामांबाबत बोलताना बादशाह यांनी स्पष्ट केले की, मार्च तिमाहीत कदाचित मोठा धक्का बसणार नाही. मात्र, जून तिमाहीपासून (Q1FY27) याचे स्पष्ट परिणाम दिसू लागतील, विशेषतः ऊर्जेच्या किमती उच्च स्तरावर राहिल्यास संकटाची तीव्रता वाढेल. या संपूर्ण आर्थिक पेचप्रसंगाचा खरा आणि पूर्ण परिणाम वर्ष २०२६ च्या उत्तरार्धात अधिक प्रकर्षाने समोर येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आयटी क्षेत्राकडे आशेचा किरण

बाजारात सर्वत्र नकारात्मकता असली तरी, माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्राबाबत बादशाह यांनी काहीसा सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे. गेल्या ३ ते ६ महिन्यांत आयटी क्षेत्राने मोठी घसरण अनुभवली आहे, त्यामुळे आता या क्षेत्रातील व्हॅल्यूएशन आकर्षक वाटू लागले आहे. हे क्षेत्र आपल्या सामान्य स्तरावर (Mean Reversion) परतण्याची दाट शक्यता असून, जागतिक भू-राजकीय संकटाचा या क्षेत्रावर होणारा थेट परिणाम तुलनेने कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

गुंतवणूकदारांसाठी कानमंत्र

कच्च्या तेलातील चढ-उतार, पश्चिम आशियातील तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) सातत्यपूर्ण विक्री यामुळे सध्या बाजारात अस्थिरता आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी घाईघाईने मोठे निर्णय घेणे टाळावे. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची रणनीती आखणे सध्या फायद्याचे ठरेल. बाजार कोसळल्यानंतर चांगल्या दर्जाचे समभाग रास्त भावात उपलब्ध होण्याची संधी देखील निर्माण होईल, असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news