रेणुका कल्पना
सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेनं बॉलिवूडमध्ये खळबळ माजलीय. पैसा, प्रसिद्धी, यश अगदी दारात लोटांगण घालत असताना नैराश्य येण्याचं कारणच काय, असा प्रश्न अनेकांना पडतोय; पण सगळं सुरळीत असेल तरीही माणसाला नैराश्य येऊ शकतं हे अभिनेत्री दीपिका पादुकोन हिच्या उदाहरणावरून कळतं.
'माझ्या मनात सतत एक रिकामंपणाची भावना यायची. प्रचंड वाईट वाटायचं. हाता-पायांना अचानक घाम फुटायचा. मधूनच घाबरायला व्हायचं, कासावीस व्हायचं. असं वाटायचं की आपण कशाततरी अडकलोय. तिथून बाहेर पडावं आणि मोकळा श्वास घ्यावा', मनानं आजारी असलेल्या व्यक्तीचा हा अनुभव आहे. आणि मनानं आजारी असणारी व्यक्ती दुसरी, तिसरी कुणी नाही तर आपली दीपिका पादुकोन आहे.
तिला आपली म्हणण्याचं कारण जागतिक स्तरावरच्या एका परिषदेत भारतकन्या दीपिका तिची आपबिती सांगत होती. गेल्या जानेवारीत वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेने तिला मानसिक आरोग्य या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं होतं. तिला बोलावलं होतं, बॉलिवूड अॅक्ट्रेस म्हणून नाही तर 'लीव, लव, लाफ' या एनजीओची संस्थापक म्हणून. ही एनजीओ मानसिक आजारावर काम करते.
2013-14 च्या आसपास दीपिका क्लिनिकल डिप्रेशन म्हणजेच नैराश्याने ग्रस्त होती. 'मला डिप्रेशनचा त्रासही अशावेळी होऊ लागला, जेव्हा मला त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. माझं करिअर एकदम भन्नाट चाललं होतं. माझे एक से बढकर एक सिनेमे थेटरात गाजत होते. माझं रिलेशनशिपही मस्त चाललं होतं. माझे आई-वडील, बहीण सगळेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी प्रसिद्धीच्या उंच शिखरावर होते. आणि अशावेळी मला हळूहळू डिप्रेशनचा त्रास होऊ लागला,' असं सांगत दीपिकाने आपल्या मुलाखतीला सुरुवात केली. आयुष्यात काहीतरी वाईट गोष्ट घडली तरच डिप्रेशन येतं, हा एक गोड गैरसमज असल्याचं दीपिकाच्या उदाहरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
ताप, सर्दी, खोकला यांसारख्या शारीरिक आजारांसारखी डिप्रेशनची सुरुवात काही एका दिवसात, एका तासात होत नसते; पण हे सगळं कुठून सुरू झालं याचा विचार करायला गेलं तर दीपिकाला एक सकाळ आठवते. एके दिवशी सकाळी दीपिकाला जोरात चक्कर आली आणि तिची शुद्ध हरपली. तेव्हा ती घरात एकटी राहायची. त्यामुळे घरातल्या फरशीवर कितीतरी वेळ ती तशीच पडून होती. नशिबाने घरकाम करणार्या बाई घरी आल्या. त्या बाईंनी दीपिकाला उचललं. पाणी दिलं.
असं अचानक कसं झालं हे दीपिकाच्या लक्षातच येत नव्हतं. तिने लगेचच डॉक्टरांची वेळ घेतली आणि त्या दिवशीची सगळी कामं थांबवून ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासलं. अतिकामामुळे ताण आला असेल किंवा तुझं ब्लडप्रेशर वाढलं असेल, असं सांगत डॉक्टरांनी तिला आराम करायचा सल्ला दिला. दीपिकाने तो अख्खा दिवस झोपून काढला. म्हणून दिवसभर झोपून राहावं वाटायचं.
या घटनेनंतर दीपिकानं पुन्हा काम चालू केलं; पण त्यानंतर मनात सतत एकप्रकारची रिकामंपणाची भावना यायची. त्याला दुःखाची किनार असायची. अचानक घामाघूम व्हायला लागायचं. जीव कासावीस व्हायचा. बाहेर पडून मोकळा श्वास घ्यावा, असं वाटायचं. उगाच रडू यायचं.
काहीही कारण नसताना रडावंसं वाटायंच. कुणी काही बोललं नाही, रागावलं नाही, काही वाईट झालं नाही, तरी रडू यायचं. एका रूममध्ये ती बसलेली असेल तर अचानक रडावं आणि स्वतःला व्यक्त करावं असं वाटायचं. उठू नये, काही करू नये, असं वाटायचं. समोर आलेल्या वास्तवापासून, मनातल्या वाईट भावनांपासून पळून जाण्याचा झोप हा मार्ग होता. म्हणून दिवसभर झोपूनच रहावसं वाटे. काही खावंप्यावं वाटत नसे. कामावर जावसंही वाटायचं नाही. काम करण्यामागचं सगळं मोटिवेशनच गेलं होतं.
त्याच सुमारास एकदा दीपिकाचे आई-वडील तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आले. चार दिवस राहिले. मग परत जाण्यासाठी सामानाची बांधाबांध सुरू असताना दीपिका आईकडे एकटक बघत बसली. आणि अचानक तिच्या मनाचा तोल सुटला. ती अचानक ओक्साबोक्शी रडू लागली.
आईनं जवळ घेतलं. विचारपूस केली. काही प्रॉब्लेम आहे का, विचारलं. कामावर कुणी त्रास देतं का, रिलेशनशिपमधे काही बिघडलंय का, हेही विचारून घेतलं; पण नेमकं काय बिघडलंय हे बोटं ठेवून दीपिकाला सांगताच येत नव्हतं. मग आईने 'दीपिका तुला काऊन्सिलरकडे जाण्याची गरज आहे,' असं तिच्या लक्षात आणून दिलं.
आपलं मनही आजारी पडतं
आईच्या सांगण्यावरून दीपिकाने ऍना चॅण्डी या प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेतली. त्यांच्या आणि इतर काही डॉक्टरांच्या मदतीने शेवटी तिच्या डिप्रेशनचं निदान झालं. दीपिका सांगते, 'लोकांच्या संपर्कात येणं, वेगवेगळ्या इवेण्टमध्ये बोलणं, रोज शूटला जाणं, माझं अक्टिंगचं काम करणं हे सगळं मी करत होते; पण मनाने मी तिथे नव्हतेच. माझ्या आजाराचं निदान झालं, तेव्हा मला फार हायसं वाटलं. जीवात जीव आला.'
डिप्रेशनमध्ये आपल्याला नक्की काय होतंय, हे कळणंसुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावतं, असं दीपिका सांगते. हे निदान होणं हा तिच्या बरं होण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा होता. दीपिकाचा प्रवास फार महत्त्वाचा आहे. तू काऊन्सिलरकडे जावं असं तिच्या आईनं तिला सुचवल्यानंतर दीपिका तिचा सल्ला धुडकावून लावू शकत होती. मला काही वेडबीड लागलेलं नाहीय, असं म्हणू शकत होती. किंवा तिची आईही तिला काऊन्सिलरकडे जाण्यापासून रोखू शकली असती; पण असं झालं नाही.
आपलं शरीर आजारी पडतं तसंच आपलं मनही आजारी पडतं आणि त्यालाही डॉक्टरांची गरज असते हे आपण स्वतः मान्य करणं मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. एका अर्थाने मानसिक आजारातून बाहेर पडण्याची हीच पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. त्याचसोबत कुटुंबाची साथही हवी, हे दीपिकाच्या प्रवासातून दिसून येतं. म्हणून दीपिकाचा प्रवास महत्त्वाचा आहे, असं म्हणता येईल.
तुम्ही एकटे नाही!
आपल्याकडे भारतात मानसिक आजारांविषयी अनेक गैरसमज आहेत. काऊन्सिलरकडे जावं लागतंय म्हणजे माणूस वेडा झालाय असचं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. मनाने आजारी असणार्या माणसाकडे आपण लोकही वेगळ्याच काटेरी नजरेनं बघतो. ही भीती दीपिकालाही होती. आपण काऊन्सिलरकडे जातोय ही गोष्ट कुणाला कळू नये, याची काळजी दीपिकालाही होती.
चारचौघांमध्ये गेल्यावर कुणी 'कशी आहेस?' असं विचारलं तर दीपिकाही सर्वसामान्य माणसांसारखंच खोटं सांगायची. आपण मानसिक आजारी आहोत हे सांगणं तिला बरोबर वाटत नसे; पण ही गोष्ट नंतर लक्षात आली. मानसिक आजारांबाबत आपल्याच मनात किती टॅबू आहे, याची तिला जाणीव झाली. आणि त्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये होतो हे दीपिकानं जगजाहीर केलं. आपलं डिप्रेशन कबुल केलं.
डिप्रेशनमधून बाहेर पडल्यावर आता दीपिका 'लिव लव लाफ' नावानं एक एनजीओ चालवते. तिच्यासारखा प्रवास करणार्या, डिप्रेशनमधून जाणार्या लोकांना आधार देऊन, त्यांना त्यातून बाहेर काढण्याचं काम ही एनजीओ करते. एनजीओकडून तुम्ही एकटे नाहीत म्हणजेच 'यू आर नॉट अलोन' हे कॅम्पेन चालवलं जातं. मानसिक रुग्णांसोबत आम्ही उभे आहोत. तुम्ही एकटे नाही, हा विश्वास त्यांना देण्यासाठी हे कॅम्पेन चालवलं जातं.
मानसिक आजारातून बाहेर येणं शक्य आहे
सॅडनेस किंवा दुःखी असणं आणि डिप्रेस्ड असणं यात फरक असतो. मनात दुःख असेल तर थोड्याफार काळात त्याचा निचरा होतो; पण हेच दुःख फारकाळ घर करून राहत असेल तर ते निव्वळ दुःख नसतं. ती डिप्रेशनची सुरुवात असते. दोन आठवड्यांहून जास्त काळ दुःखी वाटत असेल तर काहीतरी गडबड आहे हे ओळखून आपण काऊन्सिलरकडे गेलं पाहिजे, असा सल्ला दीपिका देते. मानसिक आजारातून बाहेर येणं सहज शक्य आहे. काऊन्सिलरची मदत आणि त्यासोबत आपली लाईफस्टाईल बदलणं एवढंच करावं लागतं. शारीरिक व्यायामासोबत मेडिटेशनसारखे मानसिक व्यायाम करणं, स्वतःच्या मानसिकतेत बदल करणं आणि त्यात सातत्य ठेवणं गरजेचं असतं, असं दीपिका आपल्या मुलाखतीत सांगते. चांगलं आरोग्य म्हणजे फक्त आजारी नसणं एवढाच अर्थ नसतो. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुद़ृढताही आरोग्याच्या संकल्पनेत येते; पण यामधे आपलं मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त दुर्लक्षित राहतं. मानसिक आरोग्याबाबतीत आधीच लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. त्यातही जवळपास 80 टक्के मानसिक रोग्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. अशा परिस्थितीत वेफने मानसिक आरोग्याच्या विषयावर बोलणं नक्कीच महत्त्वाचं आहे.
दीपिकाच्या चार टिप्स :
1) आपण दुःखी आहोत की डिप्रेस्ड आहोत हे ओळखा
2) डिप्रेस्ड असू तर पहिले आपण आपलं डिप्रेशन स्वीकारायला हवं
3) काऊन्सिलरची मदत घ्यायला हवी
4) डिप्रेशनमधून जाणार्या आपल्या सारख्यांच्या सोबत उभं राहायला हवं