

डॉ. प्राजक्ता पाटील
दररोज मॉइश्चरायझर लावूनही त्वचा कोरडी, खरखरीत किंवा राठ राहते, हा अनुभव अनेकींनी घेतलेला असेल. अनेकदा याचे खापर त्या-त्या उत्पादनांवर फोडले जाते आणि नव्या प्रसाधनांचा शोध घेतला जातो; पण हे साफ चूक असून त्वचेवर या प्रसाधानांचा परिणाम न होण्यामागे आंतरिक आरोग्याच्या काही लपलेल्या समस्या असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, त्वचेची आर्द्रता केवळ क्रीम्स किंवा लोशन्समुळे नाही, तर शरीराच्या आंतरिक पोषण व संतुलनावरही अवलंबून असते. त्याविषयी...
शरीरात आवश्यक फॅटी आम्लांची म्हणजेच ओमेगा-3 आणि ओमेगा-6 यांची कमतरता. हे दोन्ही घटक आरोग्यदायी चरबी त्वचेवर आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मजबूत संरक्षक थर तयार करतात. त्यांची कमतरता असल्याने त्वचा कोरडी होते. चिया बिया, आक्रोड, जवस यामध्ये ही पोषकद्रव्ये मिळतात.
जीवनसत्त्वे व खनिजांची कमतरता डी जीवनसत्त्वाच्या अभावामुळे त्वचा कोरडी व निस्तेज दिसते, तर जीवनसत्त्व अ व ई त्वचेत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. झिंक या खनिजामुळे त्वचेवरील खरखरीतपणा कमी होतो व जखमा भरून येण्यास मदत होते. आहारात ही पोषकद्रव्ये कमी असतील तर कोणतेही मॉईश्चरायझर उपयोगी पडत नाही.
शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडणे - निरोगी राहण्यासाठी सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम यांसारखे इलेक्ट्रोलाइटस्ही आवश्यक असतात. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्यास त्वचा मुलायम राहते.
हार्मोन्स व थायरॉईडमधील असंतुलन हायपोथायरॉईडीझम, रजोनिवृत्तीपूर्व अवस्था किंवा इस्ट्रोजेन व प्रोजेस्ट्रोन हार्मोन्समधील बदल यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलांचे उत्पादन कमी होते. अशावेळी बाह्य मॉईश्चरायझर काहीसा दिलासा देतात; पण कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होत नाही. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून हे असंतुलन ओळखणे व दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे.
पचन व आतड्यांचे आरोग्य - कमी आम्लता, पचनातील दोष किंवा पोषणशोषणातील समस्या यामुळेही त्वचेवर प्रसाधनांचा परिणाम दिसून येत नाही. प्रॉबायोटिक्स, तंतुमय आहार व योग्य वैद्यकीय उपचारांमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारल्यास त्वचा हळूहळू निरोगी व मऊसर होते.