मृणाल सावंत
पोटदुखी झाली, की अगदी अस्वस्थ वाटू लागते. मग, आपण मेडिकलमधून गोळ्या आणून त्या खाऊन टाकतो; पण हा उपाय तात्पुरता आहे. पुन्हा पोटदुखी चालू होते; पण आयुर्वेदाने यावर एक रामबाण उपाय सांगितला आहे, तो म्हणजे ताक.
ताकाचे महत्त्व अगदी हजारो वर्षांपासून म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून आहे. किंबहुना श्रीकृष्णाच्याही आधीच्या काळापासून याचे महत्त्व आहे. तसे हिंदू, शीख आणि जैन धर्मात याच्या सेवनाने मिळणारे अनेक फायदे सांगितले आहेत.
दिवसातून तीन ते चार वेळा भाजलेले जिरे, थोडे मीठ आणि बारीक वाटलेले मिरे टाकून ताक प्यायल्यास एका आठवड्यात पोटातील दुखणे थांबते.
आपल्या पोटात अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव संचार करत असतात. पोटात असलेल्या लहान व मोठ्या आतड्यांमध्ये हे कृमी कोटींच्या संख्येने असतात; पण त्यापैकी काही सूक्ष्म जीव आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असतात, तर काही उपद्रवी असतात. नुकसानकारक कृमी अधिक सक्रिय झाल्यास आपल्याला अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. उदा. मळमळ, अजीर्ण, ताप, थकवा, वारंवार शिंक, उलटी, पोटदुखी अशी लक्षणे सांगितली आहेत.
पोटाचे विकार सुरु असताना रुग्णाने पाचनक्रियेत कुठलाही अडथळा निर्माण होईल, असा कोणताही पदार्थ खाऊ नये. गोड पदार्थ वर्ज्य करावेत. अपचन आणि अजीर्ण झाल्यावर ताक घ्यावे. तसे पाहायला गेले, तर रोजच्या जेवणात दिवसातून एकदा तरी ताक घ्यावे. याबरोबरच भूक न लागणे, पोटात जोरात कळ येणे आदी लक्षणेही जाणवतात.