डॉ. सपना चौधरी
रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 50 व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला 'पेरिमेनोपॉजल पिरियड' म्हणतात. हा काळ साधारणपणे 3 ते 4 वर्षांचा
असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.
मेनोपॉजची लक्षणे
मासिक पाळीच्या चक्रात बदल होणं – हा बदल विविध स्त्रियांमध्ये विविध प्रकारे दिसून येतो.
पाळी महिन्याच्या महिन्याला येते; मात्र रक्तस्त्राव कमी होतो किंवा खूप रक्तस्त्राव होत राहतो आणि काही महिन्यांनी पाळी यायची थांबते.
जननेंद्रियावरील परिणाम
गर्भाशयाच्या तोंडाचा आकार लहान होऊन ते आत सरकतं.
योनीमार्गाचा आकार लहान होतो.
गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अशक्त होऊन ते सैल होतात व गर्भ पिशवी खाली उतरते.
गर्भ पिशवी आकाराने कमी होते.
अंडाशय लहान होते. त्यामुळे त्यातून स्रवणारी स्त्रीत्व देणारी इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॅान नामक हार्मोन्स कमी होतात. त्याचे परिणाम स्त्रीच्या संपूर्ण शरीरावर दिसू लागतात.
गर्भ पिशवी खाली आल्याने मूत्रमार्गावरील नियंत्रण कमी होतं. त्यामुळे जोरात खोकल्यावर वा शिंक आल्यावर आपोआप लघवी बाहेर पडते.
लघवीवर ताबा राहत नाही. त्यामुळे पहिल्यापेक्षा वरचेवर लघवीला जावे लागते.
लघवीला जळजळ होऊ लागते. (कारण, इस्ट्रोजन हार्मोन्सची कमतरता) या गोष्टींची लाज वाटून आत्मविश्वास डळमळतो. अनेकदा लोकसंपर्क टाळून एकटे राहण्याकडे अशा महिलांचा कल असतो.
ऑस्ट्रियो पोरेसी
जसं-जसं वय वाढत तसं-तसं हाडांतील कॅल्शिअमचं प्रमाण घटत जातं. रजोनिवृत्तीमध्ये स्त्रीला देणारी हार्मोन्सची पातळी रक्तातील व हाडांतील कॅल्शिअमचं प्रमाण संतुलित ठेवतं. त्यामुळे हाडांतील कॅल्शिअम वेगाने निघून जायला लागते व हाड ठिसूळ व्हायला लागतात. याला ऑस्ट्रियो पोरेसी म्हणतात. यामुळे जरासं पडण्याने मांडीची, हातांची हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात.
संधीवात वा सांधेदुखी
गुडघ्यामध्ये, घोट्यांमध्ये, टाचांमध्ये दुखणी सुरू होतात. या सर्व गोष्टींत हाडांची झीज होऊ लागते. कंबरदुखी, पाठदुखी लागते. मानेच्या स्पॉन्डेलायटीसची सुरवात होते. त्यामुळे चक्कर येणं, मान दुखणं, हाताला मुंग्या येणं इत्यादी त्रास सुरू होतात.
मानसिक आरोग्य
औदासिन्य, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणं.
अंग एकदम गरम-गरम वाटायला लागतं.
घाम सुटणं, अंग एकदम थंड पडणं, गरम-थंड हवा सहन न होणं, डोकेदुखी जाणवत राहणं, छातीत धडधड, झोप न लागणं असे बदल स्वभावात होऊ लागतात. पाळी न आल्यामुळे गरोदर राहण्याची सुप्त भीती मनात राहते.
हार्मोन्सचे असंतुलन
रजोनिवृत्तीमध्ये स्त्रीला देणारी हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे चेहर्यावर लव येणं, त्वचेची कांती कमी होणं, तिला सुरकुत्या पडणं, केस पातळ होणं, वजन वाढणं या गोष्टी होतात.