

डॉ. महेश बरामदे
रोगांपासून बचाव करण्यासाठी ई जीवनसत्त्व अत्यंत गरजेचे असते. त्याची कमतरता निर्माण झाल्यास केस, डोळे, त्वचा यांच्याशी निगडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शारीरिक विकास आणि तंदुरुस्त राहणे यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे यांची आवश्यकता असते. या घटकांची कमतरता असल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
कमी चरबीयुक्त आहार घेतल्यास शरीराला ई जीवनसत्त्वाची कमतरता भासते. ज्या लोकांना आतड्यांशी निगडीत आजार आहेत उदा. क्रोहन आणि पित्त (गॉलब्लाडर) या समस्या भेडसावत असतील त्यांच्यामध्ये ई जीवनसत्त्वाची कमतरता असते.
1) स्नायू कमजोर होतात ः ई जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास स्नायू कमजोर होतात. ई जीवनसत्त्व आणि सेलेनियमची कमतरता असल्यास मायोपॅथीची समस्या वाढते. मायोपॅथीमध्ये स्नायू सुकायला लागतात. ते पसरू लागतात किंवा स्नायूंमध्ये वाकडेपणा येतो, ज्यामुळे शरीराचे अवयव वाकडे होऊ लागतात. चालण्या-फिरण्यात अडचणी निर्माण होतात.
2) द़ृष्टी कमी होणे ः ई जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांचा रेटिना आणि डिजनरेशन पातळ होते. त्यामुळे डोळ्यांतील आतल्या भागावर त्याचा परिणाम होतो. अनेकदा द़ृष्टी धूसर होते आणि रातांधळेपणा येऊ शकतो.
3) रक्ताची कमतरता ः अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता होऊ लागते. ई जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि व्यक्ती अशक्त होऊ लागते.
शाकाहारी लोकांनी ई जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी भाज्या, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, रताळे, सलगम, मोहरी, आंबा, ब्रोकोली, गहू, बीन्स, अव्हाकॅडो इत्यादींचा समावेश आपल्या आहारात करावा.