

डॉ. मनोज शिंगाडे
आपल्या शरीरातील विविध क्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हार्मोन्स (संप्रेरके) हे अतिशय महत्त्वाचे असतात. हार्मोन्स म्हणजे शरीरात विशिष्ट ग्रंथींमधून निर्माण होणारे रासायनिक दूत, जे रक्ताद्वारे शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचतात व विशिष्ट क्रिया घडवून आणतात. हे अत्यल्प प्रमाणात तयार होतात; पण त्यांच्या परिणामांचा व्याप फार मोठा असतो.
मानवी शरीरात पिट्यूटरी, थायरॉईड, अॅड्रिनल, पॅनक्रियाज, गोनॅडस् (बीजग्रंथी) अशा अनेक अंतःस्रावी ग्रंथी आहेत, ज्या वेगवेगळे हार्मोन्स तयार करतात. उदाहरणार्थ, इन्सुलिन हे पॅनक्रियाजमधून स्रवणारे हार्मोन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. इन्सुलिनमध्ये बिघाड झाल्यास मधुमेह (डायबेटीस) होतो. त्याचप्रमाणे, थायरॉईड ग्रंथीचे हार्मोन्स चयापचयावर प्रभाव टाकतात. या हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास वजन वाढणे, थकवा, मन:शक्ती कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
महिला व पुरुषांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणेची क्षमता, लैंगिक क्षमता अशा अनेक बाबी गोनॅडस्मधून निर्माण होणार्या हार्मोन्सवर अवलंबून असतात. मुलामुलींमध्ये वयात येताना होणारे शारीरिक बदल, उंची वाढ, भावना व वर्तन यात होणारे बदल हे सर्व हार्मोनल बदलांमुळेच घडून येतात. मानसिक आरोग्यही हार्मोन्सशी निगडित आहे. सेरोटोनिन, डोपामिन, ऑक्सिटोसिन ही मेंदूतील हार्मोन्स सकारात्मक भावना, झोप, तणाव नियंत्रण, प्रेरणा यांसाठी जबाबदार असतात. त्यामुळे हार्मोनल असंतुलन झाल्यास नैराश्य, चिंता, झोपेचा अभाव अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
सकस आहाराचा अभाव, यकृताचे सदोष कार्य, मानसिक ताण, अपुरी झोप, थॉयरॉईड ग्रंथीचा दोष या कारणामुळे हार्मोन्सचा समतोलपणा ढासळतो. हार्मोन्समधील असमतोलपणा लवकर लक्षात येत नाही. वजन वाढणे, छातीत दुखणे, नैराश्य, थायरॉईडसंबंधी आजार, डोकेदुखी, अर्धशिषी, स्वभावात बदल, चिंता करणे, गरमी लाली, स्थूलपणा येणे, कामाचा कंटाळा येणे आदी हार्मोन्स विकाराची लक्षणे सांगितली जातात.
सध्याच्या काळात तर प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हार्मोन्सच्या आजाराने ग्रासलेले दिसून येतात. हार्मोन्सचा प्रश्न शाळेतील मुलांनाही होऊ शकतो किंवा युवकालाही होऊ शकतो. आपल्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण समतोल राहण्यासाठी काही गोष्टीं लक्षात घ्यायला हव्यात.
प्लास्टिकपासून दूर राहा : प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्या शरिरातील हार्मोन्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सबब जेवढे शक्य तेवढे प्लास्टिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
चरबीवर नियंत्रण ठेवा : रक्तपेशी चांगल्या राहण्यासाठी चांगल्या चरबीची शरीराला गरज असते; परंतु चरबीची अवास्तव वाढ ही शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. रिफाईंड शेंगदाणा तेल, तेलकट आहार, फास्ट फूड, सोयाबीन तेलाचा वापर, सकस आहाराचा आभाव, अतिमांसाहार, लोणी, तूप आदींच्या आहारामुळे शरीरात अनावश्यक चरबी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. सकस आहार आणि व्यायामामुळे चरबीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होऊ शकते. वाढत्या चरबीमुळे हार्मोन्सबरोबर रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करण्याच्या सवयीमुळे देखील शरीरातील स्थूलपणा वाढतो. त्यामुळे दररोज व्यायाम आणि नियंत्रित आहार असणे गरजेचे आहे.
ध्यानधारणेमुळे मनावरील ताण, तणाव हलका होण्यास हातभार लागतो. मानसिक ताणतणावामुळे हार्मोन्सचे आजार निर्माण होतात. अतिताणामुळे कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यासारखे आजार होण्याची शक्यता संभवते; परंतु सकाळी वीस मिनिटे आणि सायंकाळी वीस मिनिटे आपण ध्यानधारणा, योगासने करण्यास वेळ दिला, तर आरोग्यविषयक तक्रारी एकदम कमी होतील. ध्यानामुळे मनावरचा अकारण ताण कमी होतो. तसेच हार्मोन्समध्ये समतोलपणा राहतो.
कच्च्या फळांचा आहार : शरीराला अधिकाधिक फायबर (तंतुमय पदार्थ) मिळवण्यासाठी कच्च्या फळांचा आहार करणे पोषक ठरते. कच्च्या भाज्या खाणेही ही एक चांगली सवय मानली जाते. मुळा, गाजर, काकडी, कारले यामधून शरीराला आवश्यक फायबर मिळतात. त्यामुळे पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. फलाहार शरीरातील पाण्याचा समतोलपणा राखतो. उन्हाळ्यात यामुळे प्रकृती चांगली राहण्याबराबेरच हार्मोन्सचे प्रमाणही बिघडत नाही आणि समतोल राखला जातो.
याखेरीज शरीराला उत्तेजित करणारे पेय घेणे टाळावे. आपल्या सभोवताली दिवसभरात भरपूर चहा किंवा कॉफी पिणारी मंडळी दिसून येतात; परंतु कालांतराने त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे ग्रीन टी, हर्बल टीचा वापर करावा. अल्कोहोलिक पेय, सॉफ्ट ड्रिंक्स या गोष्टी हार्मोन्स बिघडवतात. सौंदर्यप्रसाधने आज मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. शरीराची निगा राखण्यासाठी, हात,पाय, चेहर्याचे सौंदर्य जपण्यासाठी विविध प्रकारच्या क्रीम्स आपल्याला दिसून येतात आणि त्याचा वापरही वाढलेला आहे; परंतु हेच केमिकल्सयुक्त क्रिम शरीराला घातक असते आणि हार्मोन्स बिघडवण्याचे काम करते, हे ध्यानात घ्यायला हवा. त्यामुळे शक्यतो ऑर्गेनिक आणि नॅचरल कॉस्मेटिक वापरण्यावर भर देणे आवश्यक आहे.