

डॉ. भारत लुणावत
आयुर्वेदात स्मृतिभ्रंशाला स्मृतिनाश असे म्हटले जाते. आयुर्वेदाच्या मते, वात आणि पित्त या दोन्हीचा असमतोल झाल्यास स्मृतिभ्रंश होतो असा अंदाज वर्तवतात.
स्मृतिभ्रंशास कारणीभूत आजार
अल्झायमरसारखे आजार आपल्या स्मरणशक्तीवरच थेट हल्ला करतात. कारण, या रोगात मेंदूतील पेशीच नष्ट होतात, तर हार्मोन थायरॉईडशी निगडीत हार्मोनल विकारांमुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्याशिवाय आपण डोकेदुखी, औदासिन्य, झोपेच्या गोळ्या, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यासांरख्या काही आरोग्याच्या तक्रारींसाठी मेडिकलमधून गोळ्या घेतो तसेच काही वेदनाशामक औषधे यांच्यामुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
वयानुरूप स्मरणशक्तीचा र्हास
वयानुरूप प्रत्येकाची स्मरणशक्ती कमी होतेच असे नाही; पण बर्याचदा वय वाढल्यानंतर मेंदूच्या क्षीण किंवा नष्ट झालेल्या पेशी भरून काढणे शरीराला शक्य नसते. वाढत्या वयामुळे हे सहजपणे घडत असल्याने मेंदूच्या ज्या भागात आठवणी साठवल्या जातात आणि पुन्हा आठवतात तो मेंदूचा भाग क्षीण होतो.
अमली पदार्थ आणि तंबाखूमुळे स्मरणशक्ती क्षीण
तंबाखू किंवा धूम्रपानामुळे आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. आपल्या मेंदूच्या पेशींना मिळणारा ऑक्सिजन त्यामुळे कमी होतो.
झोप उडणे आणि स्मृतिभ्रंश
झोप अपुरी किंवा शांत न लागल्यास मेंदूची स्मरणात ठेवण्याची आणि आठवण्याची अशा दोन्ही क्षमतांवर परिणाम होतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हाच मेंदू दिवसभरातील घटना स्मरणात ठेवतो; पण ही प्रक्रिया माणूस पुरेसा किंवा अपुरा वेळ झोपल्यास खंडित होते. आपल्यावर कोणत्याही प्रकारचा ताण मेंदूच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करतो.
डोक्याच्या जखमांमुळेही स्मृतिभ्रंश
एखाद्या व्यक्तीला अपघातात मेंदूला दुखापत झाल्यास भूतकाळातील गोष्टी आठवणे कठीण जाते. अशा व्यक्तीवर उपचार केल्यानंतर त्याची स्मृती परत येऊ शकते; पण काही गंभीर रुग्णांच्या बाबतीत मात्र स्मृती कायमचीच नष्ट होऊन जाते.