

डॉ. हेमंत जोशी डॉ. अर्चना जोशी
आपला बाळ जणू बाळकृष्णच आहे. त्याला रोज सर्व चवीचा खाऊ द्या, गोड द्या वा तिखट द्या. त्याच्या पुढे फळे ठेवा. त्याला रोज एका नारळाचे खोबरे खायला द्या. खाऊ द्यावे. त्यात त्यांचा खाऊ, चणे, दाणे इत्यादी पारदर्शक बरणीत नेहमी ठेवावे. असा खाऊ वयाच्या १८ वर्षे ठेवा. सोबत पाणी ठेवा. त्याला हवे ते हाताने घेऊन खाऊ द्या!
मुलांना ते १८ वर्षांचे होईपर्यंत एकदाही तहान, भूक लागू नये, एकदाही दाणा- पाणी मागावे लागू नये, यासाठी सकस आहार द्यावा. त्यामुळे ते सशक्त, दीर्घायुषी होतील. बाळकृष्णाला लोणी चोरून खावे लागे, असे आपल्या घरी होऊ नये, यासाठी घरोघरी आपण सर्व खाऊ मुलांच्या हाताशी ठेवावा. आपल्या सर्वांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व कमी आहे म्हणून आजार जास्त व आयुष्य कमी आहे. उन्हामुळे ड जीवनसत्त्व मुबलक व फुकट मिळते; पण आपले शरीर ८० टक्के झाकलेले असल्याने ते पुरेसे मिळत नाही. दुपारचे ऊन चामडीवर २ तास पडले तर ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर मिळते. यासाठी मुलांना कमीत कमी कपडे घाला. दुपारी उन्हात खेळू द्या. आपणही बाहेरची कामे दुपारच्या कमी उन्हात करावीत.
मुलांनी नुसतेच खाल्ले, तर ती गरजेपेक्षा जाड होतील. मुलांचे पोट दिसता कामा नये. ते दिसले म्हणजे त्यांना चरबी जास्त आहे, असे समजावे. त्यामुळे त्यांना २० वर्षांत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पांगळेपणा, स्मरण जाणे आदी मेंदूचे आजार होऊन ती अल्पायुषी होतील, असे शास्त्र सांगते. त्यांनी व्यायाम केला, तर ते सशक्त, सुखी, दीर्घायुषी होतील. बलराम, कृष्ण हे रोज कुस्ती, मल्लखांब, कसरत करायचे. तसा आपल्या मुलामुलींनी रोज व्यायाम केलाच पाहिजे. नाच हाही छान व्यायाम आहे. आपले सर्व नाच कृष्णकथेवरच आधारित आहेत. मुला-मुलींना जरूर नाच शिकवा. नाचाने शरीराला व मनालाही आनंद होतो.
बाळकृष्ण बासरी वाजवायचा. आपल्या मुलांनाही बासरी किंवा इतर वाद्य वाजविता यायला हवे. नंद घरी बालकृष्ण यशोदेचे दूध प्याला. एखाद्या बाळाला दूध कमी पडत असेल, तर त्याला गायीऐवजी एखाद्या मावशीचे दूध द्यावे. ब्राझीलमध्ये तर दर दुसरे बाळ मावशीचे दूध पिते. प्रत्येक गावात आईच्या दुधाची बँक पण हवी.
बाळकृष्णाला करदोडा बांधला होता तसा आपण सर्वांनी बांधला पाहिजे. दोरा घट्ट झाला म्हणजे बाळ अंगाने भरला. दोरा ढिला झाला म्हणजे बाळ बारीक झाला. मोठेपणी पोट सुटू नये, यासाठी करदोडा घातलाच पाहिजे. नेहमी भुकेच्या अर्धेच जेवावे. पोट दिसू नये. पोटभर जेवणार्यांचे वजन, चरबी वाढते. जादा चरबीने आधी पोट दिसते. मग, मधुमेह, उच्च रक्तदाब होतो. हृदय, मेंदू, मूत्रपिंड खराब होते. हे टाळावे. करदोडा हे बाळाची व आपली वाढ होते आहे, हे दाखवणारे सर्वात स्वस्त व सर्वमान्य साधन आहे.
मुलांच्या वाढीचा आलेख नेहमी वर जाणारा असावा. तो वाढीच्या आदर्श आलेखांसारखा असावा. आपण आईचे दूध कमी पडले की, गायीचे दूध व इतर पातळ अन्न देतो. यात पाणी जास्त व अन्न कमी असते. याने मुले खुरटतात.