

उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागणं ही सामान्य गोष्ट आहे, पण जर तुम्ही दिवसभरात अनेकदा पाणी पीत असाल आणि तरीसुद्धा तहान न भागत असेल, तर हे काही आरोग्याच्या गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं. यामध्ये मधुमेह (डायबिटीज), अॅनिमिया (रक्ताची कमतरता), किडनी संबंधित आजार, थायरॉईडचं अति सक्रिय होणं (हायपरथायरॉईडिझम) आणि काही औषधांच्या साइड इफेक्ट्स चा समावेश होतो. पाणी भरपूर प्यायल्यावरही तहान लागत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करून योग्य तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.
उन्हाळ्यात घामाच्या माध्यमातून शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर जातं. जर तुम्ही पुरेसं पाणी पीत नसाल तर डिहायड्रेशन होऊ शकतं. परंतु, जर तुम्ही नियमितपणे पाणी पीत असाल आणि तरीही वारंवार तहान लागत असेल, तर यामागे काही आरोग्यविषयक कारणं असू शकतात.
डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा वारंवार तहान लागण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, तेव्हा शरीर अधिक पाणी मागतं. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना सतत तहान लागते. अशावेळी केवळ पाणी पिण्याने उपयोग होत नाही. लक्षणांमध्ये वाढ झाल्यास शक्य तितक्या लवकर ब्लड शुगर तपासणी करणे गरजेचे आहे.
शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर ऊतींना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो. परिणामी शरीर थकून जातं आणि पाण्याची गरज अधिक भासते. वारंवार तहान लागणं हे अॅनिमियाचं लक्षण असू शकतं.
थायरॉईड ग्रंथी जर जास्त सक्रिय (Hyperthyroidism) असतील, तर शरीराची चयापचय प्रक्रिया (metabolism) अधिक वेगानं होते. यामुळे शरीरातून जास्त घाम जातो आणि पाण्याची गरज वाढते. परिणामी वारंवार तहान लागते.
किडनीचं मुख्य काम म्हणजे शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं. जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल, तर शरीरात पाणी टिकून राहत नाही आणि वारंवार मूत्रविसर्जनामुळे तहान लागते.
काही औषधं (उदा. डाययुरेटिक्स, अँटीहिस्टामिन्स इत्यादी) शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करतात. अशा वेळी पाण्याची गरज अधिक भासते. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा वारंवार तहान लागणं ही सामान्य गोष्ट वाटली तरी ती गंभीर आरोग्य समस्येचं लक्षण असू शकते. त्यामुळे पाणी पिल्यानंतरही तहान न मिटल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळेत निदान आणि उपचार केल्यास मोठे आजार टाळता येऊ शकतात.