

डॉ. संजय गायकवाड
आतड्यांचे आरोग्य किंवा ‘गट हेल्थ’ या विषयावर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. यामध्ये मुलांचा विचार फारसा होत नाही; पण मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे हा एक कळीचा मुद्दा आहे.
आपल्या शरीरातील सुमारे 70 टक्के रोगप्रतिकारशक्ती ही आतड्यांमध्ये असते. आपल्या मोठ्या आतड्यात अब्जावधी सूक्ष्मजीवांची एक परिसंस्था असते, जी अन्न पचवणे, पोषक तत्त्वे शोषून घेणे आणि बाह्य संक्रमणांशी लढणे यांसारखी महत्त्वाची कामे करते.
आतड्यांचे आरोग्य उत्तम असते, तेव्हा मुलांच्या भावनांचे नियमन होते आणि अन्नातून पोषक घटक शोषले जातात. याउलट जर तिथे सूज किंवा असंतुलन असेल, तर मुलांना वारंवार सर्दी-खोकला होणे, अॅलर्जी, त्वचेवर पुरळ येणे (एक्झिमा), चिडचिड होणे किंवा एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या जाणवू शकतात. आज दर 5 पैकी 1 मुलाला एक्झिमाचा त्रास होत आहे, ज्याचे मूळ अनेकदा आतड्यांच्या बिघडलेल्या आरोग्यात असते.
मुलांच्या जन्मापासून पहिले 1000 दिवस हे त्यांच्या भविष्यातील मेंदू, रोगप्रतिकारशक्ती आणि शारीरिक विकासाचा पाया रचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मुलांच्या आतड्यांमधील बॅक्टेरियांचे प्रमाण हे आईचे आरोग्य, प्रसूतीचा प्रकार आणि आहारावर अवलंबून असते. मुलांची पचनसंस्था योग्य नसेल, तर त्यांना कितीही पौष्टिक अन्न दिले तरी त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे त्यांच्या शरीराला मिळत नाहीत.
आतड्यांच्या आरोग्याचा संबंध मुलांच्या खाण्याच्या आवडीनिवडीशीही असतो. जर मुले काही विशिष्ट पदार्थ खाण्यास नकार देत असतील किंवा खूप हट्टीपणा करत असतील, तर त्याचे कारण आतड्यांमधील बॅक्टेरिया असू शकतात. कारण, हे बॅक्टेरिया मेंदूला विशिष्ट चवीचे संकेत पाठवत असतात.