14 day no sugar challenge | 14 दिवस साखर पूर्णपणे सोडल्यास...

14 day no sugar challenge
14 day no sugar challenge | 14 दिवस साखर पूर्णपणे सोडल्यास...
Published on
Updated on

डॉ. संतोष काळे

आरोग्य सुधारण्यासाठी ‘साखर सोडणे’ (नो शुगर चॅलेंज) हा एक उत्तम निर्णय ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, 14 दिवस साखरेचे सेवन बंद केल्यास केवळ वजन कमी होत नाही, तर शरीराची चयापचय शक्ती पूर्ववत होते, संप्रेरकांचे संतुलन सुधारते आणि अन्नावर प्रक्रिया करण्याची शरीराची पद्धत पूर्णपणे बदलून जाते.

शरीरावर होणारे बदल टप्प्याटप्प्याने कसे घडतात ते खालीलप्रमाणे आहे.

1 ते 3 दिवस : संघर्षाचा काळ

साखर सोडल्यानंतरचे पहिले तीन दिवस सर्वात कठीण असू शकतात. यावेळी शरीराला साखरेची तीव्र ओढ (क्रेव्हिंग्ज) जाणवते. साखरेचे नियमित सेवन बंद झाल्यामुळे डोकेदुखी, थकवा, चिडचिड आणि मनःस्थितीत वारंवार बदल होणे (मूड स्विंग्स) यांसारखी लक्षणे दिसतात. याला ‘विथड्रॉवल’ असेही म्हणता येईल, कारण मेंदू साखरेच्या ऊर्जेशिवाय काम करण्यास सवय करत असतो. या काळात कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते.

4 ते 7 दिवस :

शरीराचे अनुकूलन पहिला आठवडा संपता संपता शरीराला नवीन बदलांची सवय होऊ लागते. रक्तातील साखरेची पातळी सतत कमी-जास्त होणे थांबल्यामुळे ऊर्जेची पातळी स्थिर राहते. साखरेची तीव्र इच्छा हळूहळू कमी होते आणि पोटाचा फुगीरपणा (ब्लोटिंग) कमी जाणवू लागतो. दुपारच्या वेळी जाणवणारा थकवा कमी होतो आणि शरीर खर्‍या अन्नातून ऊर्जा घेण्यास सुरुवात करते.

8 ते 14 दिवस :

प्रत्यक्ष सुधारणा दुसर्‍या आठवड्यात शरीरात द़ृश्य बदल दिसू लागतात. रक्तातील साखरेची पातळी (फास्टिंग ग्लुकोज) सुधारते, ज्यामुळे चयापचय क्रिया अधिक कार्यक्षम होते. शरीरातील दाह (इन्फ्लेमेशन) कमी झाल्यामुळे आणि पाण्याचे अनावश्यक प्रमाण कमी झाल्यामुळे पोट सपाट दिसू लागते. या काळात खरी भूक आणि केवळ सवयीमुळे लागणारी भूक यातील फरक समजू लागतो. रक्तातील साखरेच्या संतुलनामुळे झोप अधिक शांत लागते आणि मानसिक ताणही कमी होतो.

दीर्घकालीन फायदे दोन आठवड्यांच्या या प्रयोगामुळे शरीराला ‘मेटाबॉलिक रिसेट’ मिळतो. इन्सुलिनची पातळी संतुलित राहिल्यामुळे भविष्यात मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. यकृतावरील ताण कमी होतो, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका टळतो. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या जिभेची चव बदलते; खूप गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपोआप कमी होते, ज्यामुळे भविष्यात सकस आहार घेणे सोपे जाते. हे कोणतेही टोकाचे डाएट (क्रॅश डाएट) नाही. या काळात तुम्हाला नैसर्गिक कर्बोदके (कार्ब्स) किंवा फळे बंद करायची नसून, केवळ प्रक्रियेतून तयार झालेली अतिरिक्त साखर (अ‍ॅडेड शुगर) टाळायची आहे. यामध्ये सोडा, गोड दही, सॉस, पॅकेटमधील ज्यूस, मिठाया आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश होतो. अवघ्या दोन आठवड्यांत हे बदल तुमच्या आरोग्यासाठी एक नवीन दिशा ठरू शकतात. कोणत्याही पर्यायावर अवलंबून राहण्यापेक्षा 14 दिवस साखर सोडल्यास तुमच्या जिभेची चव नैसर्गिकरित्या बदलते. यामुळे तुम्हाला नैसर्गिक अन्नातील गोडवा जाणवू लागतो आणि कृत्रिमरीत्या गोड पदार्थ खाण्याची ओढ आपोआप कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news