आरोग्याच्या सर्वसामान्य तक्रारींमध्ये पायदुखीचा समावेश करावा लागेल. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही तक्रार जाणवते; पण तुलनेने स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.
पाय कशा पद्धतीने दुखतात, यावरून पाय दुखण्यामागचे कारण शोधता येते. कंबरेपासून पोटरीपर्यंत चमक येत असेल, बसले तरी त्रास होत असेल, पाय पसरून उताणे झोपले, तरी रग लागत असेल आणि वाकून काही वस्तू उचलली, तर फारच तीव्र वेदना होत असतील तर संबंधित व्यक्तीला कमरेतील मणक्यांचा आजार आहे आणि त्यामुळे पायाकडे जाणार्या नसांवर दाब येत असेल, असे निदान काढले जाते.
मधुमेह झालेल्या व्यक्तींना काही वेळा सुरुवातीला पायदुखीचा त्रास होत नाही; पण कालांतराने खूप पायदुखी सुरू होते. पायांची जळजळ होणे, पाय सुन्न होणे ही स्थिती जुनाट आणि नियंत्रित नसलेल्या मधुमेहामुळे निर्माण होते. अशा प्रकारचा त्रास नसांचा दाह, मद्यपानाचा अतिरेक, कुपोषणातून उद्भवणारी जीवनसत्त्वांची कमतरता इत्यादीमुळेही होऊ शकतो. ज्या लोकांना खूप जास्त धूम्रपान करण्याची सवय असते आणि नंतर ती सवय बंद केली तर अशा वेळीही तीव्र पायदुखीचा त्रास सुरू होतो. पन्नासएक पावले चालले की, मांड्या, पोटर्या दुखू लागतात. बसले किवा उभे राहिले तर ठणका कमी होतो. धूम्रपानामुळे पायातील रोहिण्या आणि शुद्ध रक्तवाहिन्या अरुंद होतात, हे यामागचे कारण असते.
बर्याच महिलांना पायात गोळे येतात. दिवसा तशी तक्रार नसते. पण, रात्री झोपेत थोडेसे पाय ताणले गेले की अचानक पोटरीचे स्नायू आखडतात आणि घट्ट होतात. त्यातून इतक्या भयंकर कळा येतात की, अक्षरशः ओरडावेसे वाटते. हाताने काही वेळ मसाज केल्यानंतर हळूहळू हे दुखणे कमी होते. काही वेळा हा प्रकार पावलांच्या बोटातही होतो. एक बोट दुसर्यावर चढते आणि पाऊल सरळ होत नाही. अशा प्रकारचे दुखणे काही वेळा औषधांमुळेसुद्धा उद्भवते. डाययुरोटिक्स किंवा स्टॅटिन्स यांसारखी औषधे घेणार्या रुग्णांना कधी कधी अशा प्रकारची पायदुखी होते. अशा वेळी औषधांचे प्रमाण कमी करणे किंवा बदलणे हाच उपाय असतो. याखेरीज नियमित चालणे, गरजेनुसार विश्रांती घेणे, एकाच स्थितीत दीर्घकाळ न राहणे, भरपूर पाणी पिणे आणि कॅल्शियम-जीवनसत्त्वयुक्त पोषक आहार घेणे गरजेचे ठरते.
पायांमध्ये खुबा, गुडघा आणि घोटा हेतीन मुख्य सांधे असतात. तसेच पावलांमध्येही छोटे छोटे सांधे असतात. या सर्व सांध्यांमध्ये वयानुसार झीज होऊ शकते किंवा संधिवातामुळे सूजही येऊ शकते. काही स्त्रियांच्या टाचा खूप दुखतात. आपल्या शरीराचे सर्व वजन पावलांच्या तुलनेत लहान सांध्यांवर पडते. रस्त्यावर असणारे खाचखळगे, दगड यामुळे पावलांना इजा पोहोचू शकते. अशा वेळी पादत्राणे नरम, जाड आणि चांगल्या दर्जाची असावीत. फिरायला जाताना पातळ कापडी शूज उपयोगाचे नसतात, तर जाड तळाचेमध्ये हवेच्या पोकळ्या असणारे वॉकिंग शूज उत्तम असतात. ज्यांची पावले दुखतात त्यांनी एकदा चवड्यावर, एकदा टाचेवर अशा प्रकारचा व्यायाम करावा. वाळूमध्ये चालावे. गवतावर अनवाणी चालावे.
बर्याच जणांची तक्रार असते की, पाय भरून येतात. उभ्याने काम करताना किंवा ऑफिसमध्ये दहा-बारा तास खुर्चीवर बसून काम केल्यास बर्याच स्त्री-पुरुषांचे पाय जड होतात आणि घोट्यांजवळ सूजही दिसते. घोट्याजवळच्या अशुद्ध रक्तवाहिन्या अशा प्रकारे अनेक दिवस फुगत राहिल्या तर त्वचेखाली एक गठ्ठा तयार होतो. त्याला व्हेरिकोज व्हेन्ज असे म्हणतात. गर्भारपणातील अतिरिक्त वजन, पुढे व्यायामाचा अभाव, लहान जागेत सतत उभे राहून काम करणे, अनेक तास खुर्चीत बसणे यामुळे पायातील रक्ताभिसरण मंद होते आणि अधिकाधिक रक्त नसांमध्ये साठू लागते. त्यामुळे हळूहळू निळसर रेषांची जाळी तयार होते आणि त्यानंतर पाय भरून येण्यासारख्या तक्रारी सुरू होतात.
हा त्रास होऊ नये म्हणून पायांची सतत हालचाल असावी. सोफ्यावर, खुर्चीवर बसताना पाय लोंबकळत ठेवू नयेत. शक्यतो खाली पाय पसरून बसावे, पायाखाली स्टूल घ्यावे किंवा सरळ मांडी घालून बसावे. दर तासाने इकडे-तिकडे फिरावे. टाचांवर आणि चवड्यांवर चालण्याचा व्यायाम शंभर-दोनशे वेळा करावा. रात्री झोपताना सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटे पाय उंच लोडावर ठेवावेत. दिवसासुद्धा भिंतीलगत झोपून दोन्ही पाय भिंतीच्या आधाराने 90 अंशांत उभे करून ठेवल्यास पाच मिनिटांत आराम जाणवतो. या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास आणि वेळीच उपाय न केल्यास डीपव्हेनथ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) हा त्रास होतो. पायदुखीची काही सर्वसामान्य कारणे जाणून घेतल्यानंतर आपण नियमित व्यायाम, विहार, आहार याला नक्कीच महत्त्व देऊन पायदुखीपासून सुटका मिळवू शकतो.