प्राण्यांच्या मांसाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात कृमी, ‘अशी’ घ्या काळजी | पुढारी

प्राण्यांच्या मांसाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात कृमी, 'अशी' घ्या काळजी

अस्वच्छतेमुळे आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाद्वारे मानवी शरीरात काही कृमी प्रवेश करतात. या कृमी परजीवी असल्यामुळे मानवी शरीराचा ते स्वतःच्या पोषणासाठी वापर करतात. अर्थात, त्यामुळे माणसाला वेगवेगळ्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. अतिशय चिवट असणारे हे कृमी प्रयत्नपूर्वक आणि सातत्याने उपचार करून शरीरातून काढावे लागतात.

आपल्या दैनंदिन आयुष्यात शरीराची स्वच्छता ठेवणे, केसांची नियमित निगा राखणे, अन्नपदार्थांचे संतुलन बिघडू न देणे अशा काही गोष्टींची काळजी घेतली, तर कृमींचा हा विळखा सोसावा लागणार नाही.

मानवी शरीरात परजीवीच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारचे जंत किंवा कृमी राहत असतात. वाढीच्या वेगवेगळ्या चक्रासाठी ते मानवी शरीराचा पोषणासाठी वापर करतात. त्याचा आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो. पोटात जंत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात. लहान मुलांनाच हा त्रास होतो असे बरेच जण समजतात. परंतु, मोठ्या माणसांमध्येदेखील हा त्रास बर्‍याच प्रमाणात दिसून येतो. अत्यंत चिवट आणि बरे होण्यासाठी खूप जास्त कालावधी घेणारा हा त्रास आहे. प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे हा त्रास दिसून येतो. कृमींच्या जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांना ठरावीक कालावधीनंतर रोखणे हाच यावरील उपचारपद्धतीचा प्रमुख गाभा आहे. हा त्रास होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आहाराचे पचन योग्य प्रकारे न होणे. पचन योग्य न झाल्यामुळे पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे अन्न पचण्यास आणखी त्रास होतो आणि पोट साफ होत नाही. अशावेळी शरीरात राहिलेले टाकाऊ अन्न हे आंबण्याच्या अवस्थेत जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कृमी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते.

कृमींचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक आहे सहज कृमी म्हणजे नॉन पॅथोजनिक बॅक्टेरिया. हे कृमी शरीरात निरनिराळ्या क्रिया घडवून आणण्यासाठी साहाय्यक म्हणून काम करतात; पण पॅथोजनिक बॅक्टेरिया हे शरीरात विविध प्रकारच्या त्रासांची लक्षणे निर्माण करत असतात. पॅथोजनिक कृमींचेदेखील काही प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात उवा, लिका, यासारख्या शरीराबाहेर असणार्‍या कृमींचा उल्लेख करता येईल. यांच्यामुळे त्वचेवर खाज सुटते. दुसर्‍या प्रकारचे कृमी हे शरीरात असणारे जंत होत. शरीरात असणार्‍या जंतांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये काही जंत हे रक्तात तयार होतात. काही कफामुळे तयार होतात आणि काही विष्ठेमध्ये तयार होतात.

शरीरामध्ये जे कृमी तयार होतात त्याची कारणे वेगवेगळी आहेत. अनेकदा व्यक्ती पोट बिघडले असताना किंवा अपचन झालेले असतानादेखील जेवतात. काही जण आंबट, गोड यासारखे पदार्थ किंवा पेय खूप जास्त प्रमाणात सेवन करतात. बेसन, उडीद यासारखे पीठ किंवा गुळापासून तयार केलेले गोड पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणेे, व्यायाम न करणेे, दिवसा झोपणेे, दूध-फळे, दूध आणि खारट पदार्थ असे गुणधर्माने विरुद्ध असणारे पदार्थ एकत्र करून खाणे, शिळे, नासलेले पदार्थ खाणे, भाज्या स्वच्छ न धुता खाणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांनी कृमी होण्याची शक्यता वाढते.

रक्तात जे कृमी तयार होतात ते अतिशय सूक्ष्म आणि लाल रंगाचे असतात. या कृमींमुळे डोक्याचे केस गळणे, अंगावरचे केस गळणे, पापण्यांचे केस गळणे, नखे वारंवार तुटणे, अंगावर सतत काटा येणे, खाज सुटणे यासारखी लक्षणे दिसतात. शरीरात कफ वाढल्यास देखील कृमी तयार होतात. या कृमी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. खाल्लेले अन्न जेथे साठते तेथे या तयार होतात. या प्रकारच्या कृमी वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या असतात. काही गोलाकार, काही जाड तर काही चपटे असतात. काही दोर्‍याप्रमाणे बारीक असतात, तर काही पांढर्‍या, तांबड्या रंगाच्या असतात. या प्रकारच्या जंतांमुळे तोंडाला पाणी सुटते, उलटी येते, तोंडाला चव राहत नाही. अन्नाचे पचन नीट होत नाही. ताप येतो. काही वेळा बेशुद्ध अवस्थादेखील येते. उत्साह वाटत नाही. सतत जांभया किंवा शिंका येतात.

पोटात गॅस होतो. अंग आखडल्यासारखे वाटू लागते. वजन कमी होते. आतड्यात जे जंत तयार होतात ते आणखी वेगळे असतात. त्यांचेही पाच प्रकार असतात. या जंतांमुळे पातळ जुलाब होतात. व्यक्ती बारीक होते. गुदभागी खाज सुटते आणि काही वेळा वेदनाही होतात. या कृमींची संख्या वाढली, तर व्यक्तीच्या श्वासाला आणि ढेकरालादेखील दुर्गंधी येते. हे जंत पातळ पांढर्‍या रंगाचे असतात, तर काही वेळा जाड गोलाकार आणि काळ्या-निळ्या-हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात. याप्रकारचे जंत झाल्यानंतर व्यक्तीला ताप येतो, चेहर्‍यावर पांढरट डाग दिसू लागतात. पोटात दुखते, खूप थकल्यासारखे वाटते, चक्कर येते, अन्नावरची वासना उडाल्यासारखी होते.

डुक्कर, शेळी, मेंढी यासारख्या प्राण्यांच्या मांसापासून पट्टकृमींचा संसर्ग होतो. काही जातींचे पट्टकृमी हे वनस्पतींद्वारे प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. प्राण्यांच्या मासांमध्ये हे कृमी सुप्तावस्थेत राहतात आणि त्याद्वारे माणसांच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर आपल्या शरीरातील लहान आतड्याच्या आतील भागाला चिकटून बसतात आणि पुढे ते पंधरा ते तीस फुटांपर्यंतदेखील वाढतात.

वेगवेगळ्या उपचारपद्धतीनुसार जंतांवर वेगवेगळे उपचार केले जातात. जंतनाशक औषधांमुळे जुलाब होऊन जंत बाहेर टाकले जातात; पण हा उपचार परिपूर्ण नसतो. कारण, यामुळे तेवढ्यापुरते जंत शरीराबाहेर टाकले जातात. जंतांपासून कायमची सुटका होण्यासाठी जंतांच्या बीजनिर्मितीपासून ते पुन्हा मोठे जंत तयार होईपर्यंतच्या वेगवेगळ्या अवस्थांमधील चक्र मोडावे लागते. कारण, असलेले जंत पडून गेले, तरीही त्याचे बीज आतड्यात असते आणि पोटात पुन्हा त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले, तर त्यांच्यापासून पुन्हा जंत तयार होतात. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरावीक काळानंतर ठरावीक औषधांचा पूर्ण कोर्स करावा लागतो.

या त्रासावर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा; पण त्याचबरोबर काही घरगुती उपायही करून बघावेत. लहान मुलांना जंत झाल्यास कुड्याची साल ताकात उगाळून तयार झालेल्या पेस्टमध्ये एक चिमूटभर डीकेमालीची पूड, थोडेसे हिंग घालून हे मिश्रण आठ दिवस द्यावे. यामुळे जंत जातात. ज्यांना वारंवार जंत होतात अशा व्यक्तींनी जेवणानंतर दोन ते तीन लवंगा चावून खाव्यात. जंतांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शरीराची स्वच्छता ठेवणे, हात-पाय नखे व्यवस्थित साबणाने धुणे तसेच उवा-लिका यासारख्या शरीराबाहेरच्या कृमींवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केसांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. वेळच्या वेळी नखे कापणे, स्वच्छ, शुद्ध अन्न सेवन करणे, आठवड्यातून दोनदा केस धुणे यासारख्या साध्या उपायांनीदेखील जंतांची वाढ रोखता येऊ शकते. अतिप्रमाणात मिठाई खाणे, मांसाहार करणे, कफ वाढवणारी फळे, सीताफळ, केळी, कोबी, फ्लॉवर खाणे टाळावे. जास्त प्रमाणात मिठाई खाऊ नये. महत्त्वाचे म्हणजे कितीही मोह झाला तरी उघड्यावरचे अन्न खाऊ नये.

-प्रा. विजया पंडित

Back to top button