हिवाळ्यात थंडीमुळे स्नायू किंवा शिरा आखडतात हे सर्वांना माहीत आहे. हिवाळा नसला तरीही नसा किंवा शिरा आखडतात, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र हे दुर्लक्ष महागातही पडू शकते. काही वेळा शीर किंवा नस आखडली तरी ती आपोआप बरी होते. काही वेळा आखडलेली शीर बरी न होतात तशीच दुखत राहाते. स्नायूदेखील अशाच प्रकारे आखडतात तेव्हा तीव्र वेदना होत असतात. अनेकदा झोपताना हात किंवा पाय यांच्या शिरा आखडतात आणि तीव्र वेदना जाणवतात. चालताना शीर आखडू शकते. बहुतेकदा पायाच्या शिरा किंवा नसा आखडण्याचे प्रमाण अधिक असते. ज्या धमनीच्या माध्यमातून पायाला रक्तपुरवठा होतो ती आकुंचन पावली तर पायाचे स्नायू आखडतात त्यामुळे पायात तीव्र वेदना होतात.
नसा किंवा शिरा यांच्या वेदना न्यूरोपॅथिक प्रकारातील असू शकतात. त्याचा संबंध शरीरातील मज्जासंस्थेशी असतो. पाठीच्या मणक्याची समस्या असेल तर पायांचे स्नायू आखडतात आणि वेदनाही होतात. आहारात महत्त्वाच्या खनिजद्रव्यांची कमतरता असल्यास स्नायू आखडतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले किंवा वजन जास्त असेल तरीही पायाचे स्नायू किंवा शिरा आखडणे अशी लक्षणे जाणवतात. सातत्याने शिरा किंवा स्नायू आखडण्याची समस्या निर्माण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
कॅल्शियमची कमतरता, जीवनसत्त्वांची कमतरता यांबरोबरच गार झालेल्या फरशीवर सतत चालल्याने किंवा पाय ठेवून बसल्यामुळेही शीर आखडण्याची शक्यता असते. यामुळे पायदुखीही संभवते. हे लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हिवाळ्याच्या दिवसांत पायमोजे किंवा रबरी चप्पल वापरणे हितकारक ठरते. तसेच पायांना कोमट खोबरेल तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने, महानारायण तेलाने नियमित मसाज केल्यामुळेही चांगला फायदा दिसून येतो. याशिवाय पायांच्या तळव्यांना गोलाकार फिरवणे यांसारखे व्यायाम प्रकारही दिनचर्येत असावेत.