थिरुवल्लुवर | पुढारी

थिरुवल्लुवर किंवा वल्लुवर हे सहाव्या शतकात होऊन गेलेले महान तामिळ संतकवी होते. थिरुवल्लुवर यांनी तामिळ भाषेतून लिहिलेल्या ‘थिरुक्कुरल’ या ग्रंथामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. या ग्रंथात मानवाने कोणती नैतिक मूल्ये पाळायला हवीत, त्याबद्दल लिहिले आहे. तसेच तत्त्वज्ञान, धर्मचिकित्सा, अर्थशास्त्र व सौंदर्यमीमांसा आदी विषयांबाबत या ग्रंथात ऊहापोह केला आहे.
थिरुवल्लुवर हे नेमके कोणत्या धर्माचे होते याबद्दल खात्री देता येत नाही. कोणी त्यांना हिंदू, कोणी जैन, तर कोणी बौद्ध मानतात. ‘थिरुक्कुरल’ ग्रंथात एकूण 1,330 श्लोक आहेत. दहा श्लोकांचा एक संच अशा पद्धतीने 133 संचात हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे.
हा ग्रंथ तामिळ भाषकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संत थिरुवल्लुवर यांची अनेक मंदिरे तामिळनाडूत आहेत. 1960 साली भारत सरकारच्या डाकखात्याने संत थिरुवल्लुवर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले होते.