high blood pressure : उच्च रक्तदाबाचे आव्हान | पुढारी

high blood pressure : उच्च रक्तदाबाचे आव्हान

डॉ. अंशुमन कुमार, वैद्यकीय तज्ज्ञ

अलीकडील काळात हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाने त्रस्त असणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पूर्वी रक्तदाबाची पातळी 80 आणि 120 ही सामान्य मानली जात होती; पण अमेरिकी हार्ट असोसिएशनने यात बदल करत ही मर्यादा 70 आणि 110 अशी निश्चित केली आहे. अ‍ॅथेलिट किंवा चांगली जीवनशैली अंगीकारणार्‍या लोकांचा रक्तदाब हा 60 आणि 100 असल्याचे निदर्शनास आले आहे. ही मर्यादादेखील सामान्यच मानायला हवी; परंतु ती ओलांडल्यास तपासणीची गरज भासते. हायपरटेन्शन हा काही आजार नाही; परंतु काही आजारांचे लक्षण आहे, हे समजून घेतले पाहिजे.

आपल्या रक्तवाहिन्यांत रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यातासाठी एक सामान्य दबाव असणे गरजेचे असते; पण गरजेपेक्षा अधिक ताण किंवा दबाव राहिल्यास त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असे म्हणता येईल. साधारणपणे उच्च रक्तदाबाला एखाद्या आजारासारखे मानले जाते आणि डॉक्टरदेखील त्यानुसार उपचार करताना दिसतात. या ताणतणावाचे आकलन करण्यासाठी रक्तदाबाला दोन गटांत विभागले पाहिजे. प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन. भारतात बहुतांश नागरिकांना प्रायमरी हायपरटेन्शन आहे. डॉक्टरनी एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब तपासला, तर तो अधिक दिसतो आणि त्यामागे विशेष कारणही नसते. याला आपण ‘इन्सेशियल हायपरटेन्शन’ असे म्हटले जाते. सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे मूत्रपिंड विकार, हृदयविकार, ट्यूमरचा शोध आदी. या श्रेणीतील नागरिक दुकानदारांकडून विशेषत: पेनकिलर खरेदी करत असतात.

अनेक औषधांमध्येही रक्तदाब वाढविणारे घटक असतात. जेवणात मिठाचे अधिक प्रमाण असणेदेखील सेकंडरी हायपरटेन्शनचे कारण राहू शकते. साधारणपणे आपली जीवनशैली चांगली नसली तरी हृदय मात्र चांगले काम करत असते; मात्र काही कारणांमुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि रक्तदाब वाढतो. आधुनिक उपचार पद्धतीत त्यावर उपाय असून औषध देत रक्त पातळ केले जाते आणि हायपरटेन्शन कमी केले जाते. अशा स्थितीत एड्रिनलीन हे शरीराच्या अन्य भागात मेंदू, हृदय, मूत्रपिंड आदींवर परिणाम करते.

अर्थात, रक्तवाहिन्या आकुंचित का झाल्या, हे पाहिले पाहिजे. एखादी व्यक्ती लठ्ठ असेल तर तिला रक्तदाबाची तक्रार राहू शकते. भरपूर कॅलरीयुक्त आहार, पिझ्झा, बर्गर, प्रोसेस्ड फूड, चरबीयुक्त आहार, मीठ, साखरेचे अतिसेवनदेखील रक्तदाबाला निमंत्रण देऊ शकते. अशा व्यक्तींना हृदयविकार, मधुमेह, कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. लठ्ठपणा वाढल्याने अधिक इन्सुलिन तयार होऊ लागते. इन्सुलिनचे काम ग्लुकोज कमी करण्याचे असते. आपण यास वारंवार वाढवत असाल तर तो शरीरात सोडियम आणि पाणी जमा करेल आणि परिणामी हायपरटेन्शनला ते कारणीभूत राहू शकते.

साठ ते ऐंशी किलो वजन असणार्‍या व्यक्तीने दररोज सहा ग्रॅम मिठाचे सेवन करायला हवे. खूप साखर खाणेदेखील इन्सुलिन वाढवणारे ठरते आणि त्यामुळे रक्तदाबही वाढतो. या सवयीने लोकांची जीवनशैली सुस्त होते. त्यामुळे आपण प्रत्येकाने आहाराची सूत्रे सांभाळतानाच अर्धा तास तरी व्यायाम करायला हवा. या व्यायामाचा अर्थ जीम नाही. सामान्य व्यायाम, जसे फिरणे, पळणे, पोहणे, सायकल चालविणे आदी. त्यामुळे उच्च रक्तदाब थांबवता येणे शक्य आहे. दररोज दहा ते बारा हजार पावले चालले, तर केवळ रक्तदाबच नाही, तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

तणाव हा हायपरटेन्शनचे एक मोठे कारण आहे. शहरातील आयुष्य धावपळीचे आहे. त्यात ताणतणाव असणे स्वाभाविक आहे. यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे; कारण तणावामुळे एड्रिनलिनबरोबरच आणखी एक हार्मोन तयार होतो आणि तो सोडियम आणि पाणी जमा करत लठ्ठपणाला निमंत्रण देतो. याला अनियमित आहार आणि सुस्तपणा या दोन्ही गोष्टी जोडल्या पाहिजेत. शरीरातील तणाव हा खूपच चिंताजनक असण्याचे एक कारण राहते. शिवाय मद्यपान आणि धूम्रपानदेखील उच्च रक्तदाबाचे कारण आहे.

उच्च रक्तदाब हा एकप्रकारे अनियोजित जीवनशैलीचे देणे आहे. जसजशी निष्काळजीपणाची जीवनशैली वाढेल, तसतशी हायपरटेन्शनची समस्या आणखी गंभीर होईल आणि आजारपणाचे ओझे वाढत राहील. कधी काळी मातीच्या तसेच लोखंडाच्या, पितळेच्या भांड्यात स्वयंपाक केला जायचा. आता पॉलिश केलेल्या नॉनस्टिक भांड्यांचे प्रस्थ वाढले आहे. अशा भांड्यांतील काही तत्त्वे मेटाबॉलिक सिंड्रोमला कारणीभूत ठरतात. या सिंड्रोममध्ये हायपरटेन्शनबरोबरच मधुमेह होण्यास हातभार लावतो. प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या गरम भोजनाचे सेवनदेखील धोकादायक आहे आणि ही स्थिती फास्टफूडसारखीच आहे.

बाजारात मिळणार्‍या बहुतांश खाद्यपदार्थांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात मिठाचा अधिक वापर केला जातो. मिठाचा प्रभाव कमी करण्यासाठी साखर टाकली जाते. साखरेची चटक ही एक प्रकारे धूम्रपानाची सवय लागण्यासारखीच आहे. अशा पदार्थांचे जेव्हा दुसर्‍या दिवशी सेवन करतो, तेव्हा त्यातून आणखी रासायनिक तत्त्वे बाहेर पडतात. यानुसार आपली जीवनशैली आणखी संकटात सापडते. एकंदरीतच आजारपणाचा थेट संबंध हा आपल्या जीवनशैलीशी आणि सवयीशी आहे. साधे, सरळ राहणीमान हे आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य प्रदान करते.

हेही वाचा 

Back to top button