

येथील श्री. छ. शाहू सहकारी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२०२२ साठी एफआरपीची होणारी २९९३/- रूपये इतकी रक्कम एकरकमी देणार असल्याची घोषणा चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या हंगामातील एफआरपीची रक्कम एक रकमी देण्याचा निर्णय जाहीर करणारा छ. शाहू साखर कारखाना राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा शाहू कारखान्याच्या माध्यमातून निर्माण केली आहे. विद्यमान चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनीही या परंपरेमध्ये सातत्य राखत हा निर्णय जाहीर केल्यामुळे शाहू साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकरी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
ते पुढे म्हणाले की, यावर्षी आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच राज्य शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप जमा केलेले नाही. तसेच कर्जमाफीपासूनही काही शेतकरी वंचित आहेत.
एकूणच शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला असून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. अशा परिस्थिती मध्ये छ. शाहू साखर कारखाना एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी देऊन दिलासा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. शाहू कारखान्यामध्ये ऊसदर काढण्याची परंपरा नाही. जो दर बसतो तो शेतकऱ्याला दिला जातो.असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पिराजीराव घाटगे,स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी हरितक्रांती साकारली आहे व शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत.