

गाव असो की शहर गणेशोत्सवाची चाहुल लागली की गणपतीच्या मूर्तींची दुकाने सर्वत्र दिसतात. या मूर्ती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी कैक कारागीर वर्षभर पुढ्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेऊन बसलेले असतात. तथापि सव्वाशे वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती तेंव्हा गावगाड्यात महत्वाचे स्थान अन मान असलेले बलुतेदारच स्वत: चा व्यवसाय सांभाळत गावकऱ्यांना चिखलाचे बैल, गौरीचे मुखवटे अन गणेशोत्सावासाठी गणेशाच्या मूर्ती तयार करुन द्यायचे.
साधारणपणे कुंभार, सुतार व सोनार गणेश मूर्ती बनवत असत त्यासाठी वारुळाची काळी माती किंवा नदीकाठी मिळणार्या शाडूचा वापर केला जाई. हाताने बनवलेल्या या मूर्ती तेवढ्या आखीव रेखीव नसल्या तरी त्यात भाविकतेचा भाग अधिक असल्याने घरांघरात त्याची मनोभावे पूजा केली जाई. कालांतराने या मूर्तीतील ओबडधोबडपणा बलुतेदारांना जाणवला अन सुरेख मूर्तींची कल्पना आकाराला आली. या मूर्ती तयार करण्यासाठी त्यांनी लाकडावर गणेशाची मुर्ती चितारुन त्याचे साचे तयार केले अन पुढे हे साचेच या बलुतेदारांची खासीयत बनून गेले.
याबाबत सांगताना आपल्या आजोबा अन वडीलांनी सांगितेली आठवण जागवत लातूर जिल्ह्यातील जानवळचे सागर पांचाळ म्हणाले हाताने बनवलेले गणपती सुबक नसल्याने व ते करण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने एका लाकडी फळीवर माझे खापर पणजोबा यदुराय पांचाळ यांनी गणपतीचे सुरेख चित्र काढून ते साचाच्या रुपात कोरले अन यातून आकर्षक मूर्ती तयार होवू लागल्या. हा गणपती तयार करण्यासाठी गावकरी नदीकाठची शाडू आणून ती कुंभार किंवा सोनाराला देत असत. हे बलुतदार ती बारीक वाटत असत त्यानंतर तिला चाळण लावून त्यातून मिळालेली वस्त्रगाळ माती भिजत घातली जाई. ती चांगली भिजली की लाकडाच्या साचाच्या आतल्या भागावर तेलाचा हात फिरवून शाडूची माती त्यावर थापली जाई अन पाच मिनिटात शाडूचा आखीव रेखीव गणपती तयार होई.
या मूर्तीचा मोबदला म्हणून गावचे कारभारी तसेच गावकरी बलुतेदारास मानाची सुपारी गुळाचा खडा अन खोबर्याचा तुकडा देत . वर्षाकाठी बलुत्याच्या माध्यमातून धान्याच्या रुपात गावकऱ्यांकडून मिळणारा मोबदला (बलुते) बलुतेदारांना पुरेसा असायचा त्यामुळे मानाची पान सुपारी घेत मूर्ती देण्यांत त्यांना मनोमन समाधान वाटायचं.
बलुतेदारांनी सुमारे शे दीडशे वर्षांपूर्वी तयार केलेले गणपतीचे असे साचे आज पहावयास मिळत नाहीत परंतु सागर पांचाळ यांनी त्यांच्या पुर्वजाचं हे कलावैभव मोठ्या निष्ठेन जपून ठेवलय. त्यांच्याकडे गणपतीचे असे दोन साचे आणि एक लाकडी मूर्ती पहावयास मिळते. याच गावी स्व. ज्ञानोबा पांचाळ यांनी पिंपळाच्या लाकडापासून तयार केलेली श्रीगणेशाची अतिशय देखणी मूर्ती असून तिच्यावरच्या कलाकुसरीवरुन नजर हटत नाही. गणेशाची ही मूर्ती अखंड खोडातून कोरली असून ती नित्य नुतन दिसावी यासाठी तिला बेलाच्या तेलान घासल आहे. गणेशाच्या गळ्यात पुष्पहार घालण्यासाठी मानेला मोठ्या कल्पकतेन छिद्र पाडल आहे. या छिद्रातून आरपार दोरा जातो अन गळ्यात पुष्पहार घातलेला गणेश अधिक देखणा दिसतो.
खरोखर त्यावेळी साच्यातील गणपती तेव्हा लोकांना खूप आवडले होते. विशेष म्हणजे मूर्तीकलेच कसलही शिक्षण नसताना गणपती प्रति असलेल्या भक्तीभाव अन गावकर्यांप्रति असलेला आदरभाव यातुनच बलुतेदारांच हे कलावैभव आकारला आल होत. मात्र आज ते अस्तंगत होण्याच्या मार्गावर असून या कलेच पुनरुज्जीवन करायला हवं. परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची सवय जडलेल्यांना बलुतेदारांचा गणपती आवडेल?