

Vijayapur Husband Sentenced To Life
विजयपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला विजयपूर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला 1 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजयपूर शहरातील जलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर येथे भाड्याच्या घरात राहणारा रफीक अस्तगीरसाब बलगानूर हा पत्नी परवीन हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा सातत्याने छळ करत होता. या वादावर समाजातील ज्येष्ठांनी पंचायत घेऊन समेटाचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोपीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता.
17 ऑक्टोबर 2016 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 20 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान आरोपीने धारदार शस्त्राने पत्नीच्या मानेवर, छातीवर, पाठीवर आणि खांद्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला कुलूप लावून तो फरार झाला होता.
या प्रकरणी जलनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश ए. यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे आणि अन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. त्यानुसार 30 जून 2026 रोजी न्यायालयाने आरोपी रफीक अस्तगीरसाब बलगानूर याला जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाखांचा दंड सुनावला.
या गुन्ह्याची नोंद तत्कालीन पीएसआय एन. एस. जनगौडा यांनी केली होती. प्रकरणाचा तपास सीपीआय बसवराज यलगार आणि सीपीआय सुनील कांबळे यांनी केला. न्यायालयात साक्षीदार हजर करण्याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल जे. पी. पवार यांनी पार पाडली, तर सरकारतर्फे प्रधान सरकारी अभियोक्ता एस. एच. हकीम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.