

बेळगाव : अकरा रुद्र आणि सात चिरंजीवीपैकी एक अवतार ठरलेला, गुरु द्रोणाचार्यांचा सुपुत्र तसेच अमरत्व लाभल्याने महाभारतातील कुरुक्षेत्रातील लढाईचा आजवरचा एकमेव जिवंत साक्षीदार मानला जाणारा अश्वत्थामा यांचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर बेळगावात पांगुळ गल्लीत आहे. पांगुळ गल्लीतील या मंदिरात दरवर्षी धुलिवंदनानिमित्त सामूहिक लोटांगण घालण्याची परंपरा आहे. यंदाही हा उत्सव शुक्रवारी (दि. 13) होणार असून हजारो भाविक येथे लोटांगण घालणार आहेत.
पांगुळ गल्लीत अश्वत्थामा मंदिर सुमारे तीनशे वर्षांपासून आहे. आठ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे कोणतीही मागणी करुन लोटांगण घातल्यास ती पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. काही भक्तांकडून नवस पूर्ण झाल्यानंतर लोटांगण घातले जातात. एरवी मंदिरात वर्षभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी नसते. धुलिवंदना दिवशी मात्र अश्वत्थामाचे आवर्जून दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे सकाळी दहापासूनच सायंकाळी उशिरापर्यंत मंदिर भक्तांच्या गर्दीने गजबजते.
धुलिवंदनादिवशी दुपारी बारा वाजता लोटांगण सुरु होते. दुपारी तीन वाजता संपणार्या या सोहळ्यात विविध भागातून आलेले भाविक सहभागी होतात. लोटांगण पूर्ण झाल्यानंतर पूजा करण्यात येते. कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. दक्षिण भारतात अश्वत्थामा मंदिर हे एकमेव असल्याने या मंदिराविषयी आकर्षण आहे. या मंदिरात धुलिवंदनादिवसापासून रंगपंचमीपर्यंत सलग पाच दिवस श्रीफळ वाढविला जातो. एरवी वर्षभर मंदिरात श्रीफळ वाढविले जात नाहीत, हेदेखील वेगळेपण आहे. मंदिरात रोज सकाळी नऊ वाजता पूजा होते.