

बेळगाव : शेतातील विहिरींवर बसविलेले कृषीपंप चोरणाऱ्या तिघांना अंकलगी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून चार पंपसेट आणि दुचाकी असा सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवीण सत्ताप्पा खानापुरी (वय २०), शिवाजी अशोक वंटमुरी (वय २२) आणि आनंद मल्लाप्पा करडीगुद्दी (वय २५, तिघेही रा. पंजानट्टी, ता. गोकाक) अशी संशयितांची नावे आहेत.
अंकलगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंजानट्टी परिसरात कृषीपंप चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ८ जून रोजी पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली होती. बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख व गोकाक डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून तपास सुरु करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंजानट्टीतील वरील तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी कृषीपंप चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २९ हजार रुपये किमतीचे चार पंपसेट व ४५ हजार रुपयांची दुचाकी जप्त केली आहे.