निपाणी, पुढारी वृत्तसेवा : निपाणी शहरात पोलीस प्रशासनाने दोन दिवसांपासून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात शनिवारी (दि.29) एका दिवसात शहर पोलीसांकडून 100 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मागील 2 दिवसात कारवाई झालेल्या दुचाकीं चालकांची संख्या 300 वर पोहोचली आहे. या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकारही घडल्याचे समोर आले आहे.
निपाणीमध्ये शासनाच्या आदेशानुसार, पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली आहे. मात्र याला दुचाकीस्वारांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहर पोलीस प्रशासनाने विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करणे सुरू केली आहे.
यावेळी उपनिरीक्षका उमादेवी यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने छत्रपती धर्मवीर सभांजी चौकात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. कारवाई करण्यावरून पोलिस आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. नागरिकांनी शहरात हेल्मेट सक्ती नको अशी मागणी केल्याने वाद वाढत गेला. रात्री उशिरा या वादावर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. ही कारवाई भरपावसातही पोलिसांची कारवाई सुरूच ठेवली होती. ही कारवाई या पुढील काळातही ही सुरूच राहणार असल्याचे उपनिरीक्षक उमादेवी यांनी सांगितले.