

बेळगाव : शंभर टक्के वीज बिल वसुलीसाठी हेस्कॉम स्मार्ट मीटर जोडणीवर भर देत आहे. हेस्कॉमतर्फे अनेक ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट मीटरबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बिल भरण्यास काही तासांचा विलंब झाला तरी वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्ट मीटर देताना बिलाची अगोदर माहिती देणे आवश्यक बनले आहे.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर बिल देण्यासाठी कर्मचारी घरी येत नाहीत. ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर किती बिल आले आहे, याचा संदेश पाठविला जातो. त्यानंतर संबंधित ग्राहकांनी ऑनलाईन किंवा इतर माध्यमांतून वेळेत बिल भरणे अपेक्षित असते. मात्र, मोबाईलमधील रिचार्ज संपल्यानंतर जसा मोबाईल बंद पडतो, त्याचप्रमाणे वीज बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक लाईनमनकडे धाव घेत असून, मीटर का बंद झाले, याची विचारणा करत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आहेत.
जनजागृती आवश्यक
स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहक मोबाईलवरील संदेशांकडे दुर्लक्ष करतात. काही ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याने त्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे बिल थकित राहते आणि वीजपुरवठा आपोआप बंद केला जातो. त्यामुळे हेस्कॉमने स्मार्ट मीटरबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.