

बेळगाव : माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना सत्तेपासून दूर करणारे लोकच आज त्यांचा सत्कार करत आहेत. हा मोठा राजकीय विरोधाभास आहे, असा टोला सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी शुक्रवारी (दि. ८) लगावला.
राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या ५० वर्षांच्या राजकीय प्रवासाच्या स्मरणार्थ चित्रदुर्गमध्ये आयोजित केलेल्या अभिमानोत्सव कार्यक्रमावर ते आपली प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले, येडियुराप्पा यांना सत्तेवरुन दूर करणाऱ्या लोकांनी आज त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करावा, हा एक राजकीय विरोधाभास आहे. ज्यांनी भाजपमध्ये येडियुराप्पा यांना एकाकी पाडले आणि मुख्यमंत्रीपदावरुन हटविले, तेच लोक आज त्यांच्या नावाने कार्यक्रम आयोजित करत आहेत. हा केवळ एक निवडणुकीचा स्टंट आहे, अशी टीका त्यांनी केली.
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला, तर मी पाचही वर्षे मुख्यमंत्री राहीन, या सिद्धरामय्या यांच्या विधानावर मंत्री जारकिहोळी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची निवड हीच मुळात पाच वर्षांच्या कालावधीसाठी झालेली आहे. त्यामुळे, या विषयावर वारंवार चर्चा करण्याची काहीच आवश्यकता नाही. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला कोणताही निर्णय आम्हा सर्वांवर बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.